(धनंजय क्षीरसागर)
वडूज : विधानपरीषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची मागील आठवड्यात विधानपरीषदेवर बिनविरोध निवड झाली. ही निवडणूक बिनविरोध झाली असली तरी पडद्याआड पक्षांतर्गत मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडल्या आहेत. त्याचीच परिणीती म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर माण-खटावची डागडुजी करण्याच्या दृष्टीने या तालुक्यांना अध्यक्षपदाची संधी मिळणार असल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर माणच्या सुभाष नरळे यांच्याबरोबरच खटाव तालुक्यातील मानसिंगराव माळवे यांचेही नांव शर्यतीत आले आहे.
विधानपरीषद निवडणूकीत राष्ट्रवादीचे दोन उमेदवार होते. त्यामध्ये सभापती रामराजे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या दोघांचा समावेश होता. यापैकी पहिल्या क्रमांकाची पसंती कोणाला द्यावयाची यावरुन पक्षांतर्गत घमासान झाल्याची चर्चा आहे. त्यावेळी थोरल्या पवार साहेबांनी आपले वजन राजेंच्या पारड्यात टाकले होते. मात्र त्याचवेळी माण मतदारसंघाची दुरुस्ती करण्याची जबाबदारी रामराजेंच्यावर टाकण्यात आली होती. त्यामुळे राजेंनी निवडीनंतर थेट दहिवडी येथेच पहिला कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विस्कटलेल्या कार्यकत्यांना एकत्र करण्यात आले. या खेळीने दोन्ही गोरे बंधूंवर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रित्या दबाव टाकण्याची खेळी खेळली गेली. त्यानंतर लागलीच सोनवलकर सरांचा राजीनामा घेण्यात आला.
या राजीनाम्याने अध्यक्षपदावर संधी कोणाला याबाबत चर्चा सुरु झाली. सुरुवातीला माजी आमदार कै. सदाशिव पोळ (तात्या) यांचे निष्ठावंत अनुयायी सुभाष नरळे (सर) यांचे नांव पुढे आले आहे. ते लोणार समाजातील आहेत. या समाजातील शिवाजी शिंदे यांना शेतीसमितीचे सभापतीपद देण्यात आले होते. पक्षाने सांगूनसुध्दा त्यांनी अद्याप पदाचा राजीनामा दिला नाही.
लोणार समाजाची मतदार संख्या, तसेच धनगर व वंजारी समाजाची मतदारसंख्या यांची तुलना करता वंजारी समाजाचे प्राबल्य असल्या कारणाने मानसिंगराव माळवे यांचेही नांव शर्यतीत पुढे आले आहे.
त्यांच्यासाठी दोन्ही तालुक्यातील समाजातील प्रमुख कार्यकर्ते पुढे आले आहेत. त्यांनी मांडवे येथे बैठक घेवून पक्षाचे नेते अजितदादा पवार, रामराजे नाईक निंबाळकर, धनंजय मुंडे यांना शिष्टमंडळ भेटविण्याची तयारी सुरु केली आहे. माळवे यांनी समाजकल्याण सभापती पदावर काम करताना जिल्ह्यात कोणत्याही पदाधिकार्यांना दुखविले नाही.
वडूज येथे पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणावर गजी नृत्य महोत्सव भरवला होता. त्याच्या ढोलवाटप बक्षीस समारंभासाठी वांझोळी येथे मोठा कार्यक्रम आयोजित केला होता.
मितभाषी, मनमिळावू स्वभाव, स्वच्छ पारदर्शी कारभार या माळवे यांच्या जमेच्या बाजू आहेत. असे असले तरी आ. बाळासाहेब पाटील, आ. प्रभाकर घार्गे त्यांच्यासाठी कितपत आग्रह धरतात यावर आप्पांचे भवितव्य अवलंबून आहे.