5 लाख विद्यार्थ्यांच्या माध्यमातून 16 कोटीची बचत
सातारा : 2006 पासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीतर्फे सुरु झालेले फटाके मुक्त दिवाळी अभियान आता व्यापक स्वरुपात महाराष्ट्रातील शाळा- शाळांमध्ये यशस्वीपणे राबविले जात आहे.
अंनिसच्या सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नामुळे या वर्षी राज्यभरातील 1263 शाळांमधील जवळ जवळ 5 लाख 67 हजार विद्यार्थ्यांनी या अभियानात भाग घेऊन 16 कोटी 14 लाख रुपयांच्या बचतीचा संकल्प केला.अशीमाहिती राज्य कार्याध्यक्ष अविनाशपाटील यांनी जाहीर केल्याचे महाराष्ट्रअनिस तर्फे प्रधान सचिव प्रशांत पोतदार आणि राज्य सरचिटणीस हमीद दाभोलकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारेकळवले आहे.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी राज्य कार्यवाह अनिल करवीर यांच्या पुढाकारानेकार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या माध्यमाचा वापर केला. शाळां-शाळांमध्ये जावून फटक्याच्या दुष्परीणामाचे पत्रक वाटले, फटक्यामुळे होणारे ध्वनी व वायु प्रदूषण, अपघात, करोडो रुपयाचा चुराडा, पर्यावरणाचा र्हास, बालमजुरीचा प्रश्न या बाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेतली. स्वतःचे पैसे खर्च करून प्रदूषण करून स्वतःचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही हे विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. फेसबुक, वॅाटसअप द्वारे फटक्याच्या दुष्परीणामाची माहिती प्रसारित करणे. या सारख्या अभिनव पद्धतीचा अवलंब करण्यात आला.
विद्यार्थ्यांना फटाके मुक्त दिवाळी साजरी करून किमान 100 रुपये वाचवा आणि वाचविलेल्या पैश्यातून चांगली पुस्तके, खेळणी, भेटवस्तू, मिठाई, गरिबांच्या घरी फराळ देणे, त्यांना आर्थिक, शैक्षणिक मदत करणे, सारख्या सामजिक कार्यांसाठी प्रोत्साहित करण्यात आले.
आत्तापर्यंत हे सर्व अभियान बहुतेक शाखा मुख्यतः फक्त शाळां-शाळांमध्ये राबवीत असे. परंतु असे आढळून आले आहे कि दिवाळीच्या कालावधीत आपल्या कडील व्यापारी वर्ग एक परंपरेचा भाग म्हणून मोठ्या प्रमाणात फटाके फोडीत आहे. म्हणून या अभियानाचे पुढचे पाऊल म्हणून पुणे, नांदेड व लातूर शाखांतर्फे व्यापारी वर्गाचे प्रबोधन करण्यासाठी विद्यार्थांची दिवाळी प्रबोधन रॅलीचे आयोजन करण्यात आले व त्याला व्यापार्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. पालघर शाखेतर्फे अभिनव फटाके मुक्त दिवाळी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व व्यापार्यांकडून संकल्प पत्र भरून घेतले. शहादा शाखेने फटक्याला पर्याय म्हणून पुस्तके खरेदी करा असे आवाहन करीत दरवर्षी प्रमाणे भव्य दिवाळी बुक फेस्टिवल भरविले. सांगलीतील मअंनिसच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्नामुळे पाडळी गाव गेली 5 वर्ष फटाकेमुक्त दिवाळी साजरी करीत आहे तसेच या वर्षी पदालीवाडी, निगडीगाव या दोन्ही गावांनीदेखील फटाक्या शिवाय दिवाळी साजरी केली.
नांदेड शाखेतर्फे आकाशवाणीवर या अभियानाची माहिती देण्यात आली. या अभियानाला पूरक असे पर्यावरण स्नेही दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे करण्यात आले.
फटाक्यामुळे राज्यात ठिकठिकाणी लागलेल्या मोठ्या आगीमुळे या अभियानाची गरज प्रकर्षाने जाणवत आहे म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे येत्या काही वर्षात संपूर्ण महाराष्ट्र फटाकेमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे.