सातारा : मनुष्य जन्म हा सर्वश्रेष्ठ असून या जन्मातच ईश्वराची भक्ती करता येते, आजचा मानुस अनेक व्यसनाच्या आहारी गेला आहे. त्यामुळे स्वत: बरोबर कुटुंबाचे व समाजाचे नुकसान करीत आहे, असे प्रतिपादन सद्गुरू माता सविंदर हरदेवजी महाराज यांनी केले.
संत निरंकारी मंडळ सातारा शाखेच्या वतीने सैदापूर (कोंडवे) जुना सातारा – पुणे रोड येथे आयोजित कार्यक़्रमात मार्गदर्शन करताना बोलत होत्या. त्यावेळी कार्यक्रमास प्रमुख म्हणून जि.प.सदस्या रेश्माताई संदीप शिंदे, जि.प.सदस्या अनिता चोरगे, जि.प.सदस्य भिमराव पाटील, सातारा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राजू भोसले, संत निरंकारी मंडळ सातारा झोनल इनचार्ज नंदकुमार झांबर, अनिल वायदंडे, यांची विशेष उपस्थिती होती.
पुढे बोलताना सद्गुरू माता सविंदर हरदेवजी महाराज म्हणाल्या, काही दिवसापूर्वी होळीचा सण साजरा करण्यात आला. होळी दिवशी काम, क्रोध, मोह, मद, मत्सर पाच विकाराचा आपण खर्या अर्थाने आहुती देत असतो. व्यसनाच्या आहारी गेलेल्या मानसास खर्या ईश्वराची ओळख झाल्यानंतर भक्तीची ओळख झाल्यानंतर भक्तीच्या रसामध्ये, नशेमध्ये तो रंंगून जाईल. पाप, पुण्य या बाबी एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत. चांगले कर्म करीत गेल्यास निश्चित स्वरूपात फळ चांगले मिळते, उलट दुर्लक्ष करीत गेल्यास वाईटाची प्रचिती येते, सुख, दु:खाचीही प्रचिती मानवास याच जन्मात मित्र असते. कष्टाने मिळविलेली संपत्ती ही टिकून राहते, अशाच व्यक्तीच्या घरी लक्ष्मी वास करीत असते.
संत निरंकारी कार्यक्रमास सातारा जिल्हातून व इतर जिल्ह्यातून सुमारे 20 हजाराच्या वर भक्तगण मोठ्या संख्यने उपस्थित होते. तळपत्या उन्हातही भक्तांना बसण्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला होता. दरम्यान, सातारा शहर, सातारा तालुका व शाहुपुरी पोलिस ठाण्याच्या वतीने कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.