वार्ताहर
परळी
परळी खोऱयातील निसर्ग सौंदर्य हे सर्व ज्ञात आहे. परळी खोरे हे डोंगरदऱयांनी वेढलेला असा भाग. याठिकाणी वन्य प्राण्यांचाही वावर हा सातत्याने पहायला मिळतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून वनवा लावण्याचे प्रमाण वाढल्याने शेकडो हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले आहे. भागातील वणवा धगधगत असताना वनविभागाचे नक्की करतोय काय? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहे.
परळी खोऱयातील पांगारे, केळवली, नित्रळ, कातवडी ,अलवडी, लुमणेखोल, सांबरवाडी अशा अनेक गावांच्या हद्दीतील डोंगर हे वणव्यामुळे काळेकुट्ट झाले आहेत. दरवर्षी हे वणव्यासारखे प्रकार घडत असताना वनविभागाने याविषयी किती तयारी केली, काय उपायोजना केल्या. अशाच पध्दतीचे प्रश्न हे उपस्थित होत आहे. वणव्यामुळे गुरांच्या चाऱयाचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे. अन् भागातील धगधगता वणवा हा नक्की केव्हा क्षमणार अन् वनविभागाला जाग केव्हा येणार याचीच चिंता आता ग्रामस्थांना भेडसावत आहे.
गवताळ डोंगर दाखवा अन बक्षिसे मिळवा अशीच काहीशी अवस्था
थंडीच्या दिवसात वनवा लावण्याचे प्रकार काही विकृतांमुळे होत असतात मात्र याय जिव गमवावा लागतो तो वन्य प्राण्यांना. तसेच शेकडो हेक्टर क्षेत्र जळल्याने चाऱयाचा प्रश्न अशा समस्या दरवर्षी आहेत. मात्र वनविभागाची कुशलता कुठेच पहायला मिळत नाही. सध्या भागात गवताळ डोंगर दाखवा अन् बक्षिसे जिंका अशीच गत झाली आहे.