बाप जन्मात महाराष्ट्रात यश मिळू देणार नाही
सातारा: बारामतीत येवून आव्हान देणारे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना खा. शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिले. बारामतीच काय इतर मतदारसंघात भाजपला बाप जन्मात यश मिळू देणार नाही तसेच तुमच्या डोक्यात घुसलेली सत्तेची मस्ती दूर करणारच, असे आव्हान खा.शरद पवार यांनी भाजपला दिले.
काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्र पक्षांच्या आघाडीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषद मैदानावर आयोजित सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी खा. उदयनराजे भोसले, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, श्री. छ. शिवाजीराजे भोसले, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राजेंद्र गवई, आ. शशिकांत शिंदे, आ.बाळासाहेब पाटील, आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ.मकरंद पाटील, आ.आनंदराव पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, ऋषिकांत शिंदे, वसंतराव मानकुमरे, शशिकांत पिसाळ, सत्यजित पाटणकर, रजनी पवार, सुनिल माने, नगराध्यक्षा माधवी कदम, गुलाबराव जगताप, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पवार पुढे म्हणाले, भाजप सरकारने पाच वर्षात एका ही आश्वासनांची अंमलबाजवणी केली नाही.11 हजार शेतकर्यांना आत्महत्या केल्या आहेत. आघाडी सरकारच्या काळात आत्महत्या होत असताना आम्ही ठोस पाऊले उचलली. आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबियांच्या भेटी घेऊन प्रश्नांचे निराकरण केले. आम्ही शेती उत्पादन आणि हमी भाव वाढविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र,पंतप्रधान त्याबाबत कोणतेही प्रयत्न करताना दिसून येत नाहीत. देशातील 120 कोटी जनतेला अन्न देणारा बळीराजा जगला पाहिजे, यासाठी सरकार बदलले पाहिजे. पुणे, ठाणे, रांजणगाव, सातारा येथे कारखानदारी आणून रोजगार मिळवून देण्याचे काम आघाडी सरकारने केले. परंतु 5 वर्षात बेरोजगारी वाढून देश उध्वस्त करण्याचे काम सुरू आहे.
एक मारला तर दहा त्यांचे मारू सांगत होते. परंतु सरकारने खबरदारी न घेतल्यामुळे 40 जवान शहीद झाले. ह्या गोष्टीचे आम्ही राजकारण केले नाही. उलट इतर देशांच्या दबावामुळे पाकिस्तान च्या ताब्यातील विंग कमांडरअभिनंदनची सुटका झाली. त्यावर प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न भाजपने केला.
खा. उदयनराजे भोसले म्हणाले, निवडणुकीच्या निमित्ताने देशात पुन्हा लोकशाहीची चळवळ निर्माण करायची आहे. सातारा जिल्ह्याने देशाला दिशा देण्याचे काम केले. अनेक क्रांतिकारी चळवळी या जिल्ह्यातून सुरू झाल्या आहेत.
माझे अनेक पक्षात मित्र आहेत. मात्र तत्व आड येतात तेव्हा मी तडजोड करत नाही. तुम्हाला माझी लोकप्रियता माहीत आहेच. त्यामुळेच विरोधकांच्या सभा पुढे ढकलाव्या लागल्या. मुख्यमंत्र्यांनी कोरेगाव पाठोपाठ सातार्यात सभा घेतली. त्यांनी निधी आम्ही दिला असल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्या प्रमाणे मी ही लोकप्रतिनिधी आहे. मी सतत पाठपुरावा केला म्हणून कामे झाली. सध्या होत असलेली कामांचा प्रस्ताव आघाडी सरकारच्या काळात तयार करण्यात आला होता, अशी आठवण खा. उदयनराजेंनी करून दिली. मागील निवडणुकीत भाजपने भावनिक मते घेतली. परंतु आता त्या मतांचे रूपांतर वैचारिक मतांमध्ये झाले आहे त्यामुळे यंदा तुम्हाला मते मिळणार नाहीत. विरोधकांच्या महाआघाडीला ते खिचडी म्हणत आहेत. हो आमची शेतकर्यांची भूक भागवणारी खिचडी आहे. मागच्या पाच वर्षात सत्ताधार्यांनी शेतकर्याच्या हातात वाडगे देण्याचे काम केले. सत्तेत येताच त्यांना आश्वासनांचा विसर पडला. रात्र दिवस कष्ट करणार्या शेतकर्यांचे वाटोळे करण्याचे काम ह्या सरकारने केले आहे. भाजपच्या निकटवर्तीयाना देशाची संपत्ती विकायचे काम सुरू आहे. अशावेळी लोकांना संताप आल्याशिवाय राहणार नाही.
आ.शशिकांत शिंदे म्हणाले, देशाच्या इतिहासातील महत्वाची लढाई सुरू आहे. त्यामुळे छ. शिवाजी महाराजांचे वंशंज प्रचंड मताने निवडून गेले पाहिजेत. प्रचारासाठी विरोधी पक्षांचे दिग्गज आले मात्र खा. उदयनराजेंवर टीका करण्याचे धाडस कोणी केली नाही, ह्यावरून खासदारांची ताकद स्पष्ट होते. विरोधी उमेदवार आव्हान द्यायचा प्रयत्न केला. परंतु खा. उदयनराजेंनी संयम दाखवला. त्याच बरोबर भाजपने त्यांना पक्षात घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी शेतकर्यांसाठी भाजपने काय केले ? हा विचार त्यांच्या मनात उपस्थित झाला, म्हणून त्यांनी भाजपात न जाण्याचा निर्णय घेतला. म्हणून खा. उदयनराजे ठासून आणि मोदींपेक्षा अधिक मतांनी निवडून येणार. विदर्भ, मराठवाड्यात भाजप-सेनेच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे म्हणून या निवडणुकीत भाजप-सेनेचा सुफडा साफ होणार. आज साध्वी प्रज्ञा सिंग शाहिद अधिकार्याबद्दल बाष्कळ विधान करतात. त्या हल्ल्यात सातारा जिल्ह्याचे सुपुत्र शाहिद तुकाराम ओंबळे यांचे निधन झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील जनता भाजप सेनेला शाप दिल्याशिवाय राहणार नाही. ह्या सरकारने माथाडी कामगारांच्या विरोधात निर्णय घेतले आहेत. कामगारांना उध्वस्त करण्याचे काम ह्या सरकारने केले आहे. मोदी आज सैनिकांची तुलना व्यापार्यांशी करत आहेत.कारण त्यांना पैशाशिवाय दुसरे काही सुचत नाही. मराठा समाजाने आरक्षणासाठी लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले पण सामनामधून मुका मोर्चा उल्लेख करून टिंगल टवाळी केली.
आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, लोकसभा मतदार संघात तिसर्यांदा निवडून द्यायचा निर्णय जनतेने घेतला आहे. आता मताधिक्य किती देतो एवढीच औपचारिकता बाकी राहिले आहे. जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मजबूत राहिला पाहिजे. पवारांनी शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेतले तर भाजपने फक्त घोषणा करण्याचे काम केले. त्यामुळे दिल्लीत परिवर्तन होणार आहे म्हणून संसदेत खा. उदयनराजेंना पाठवायचे आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी एकदिलाने व निष्ठेने राहणार आहोत. येत्या काही दिवसात सोशल मीडियाच्या अफवाना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले.
श्रीनिवास पाटील म्हणाले, आज पर्यंत एक अपवाद सोडला तर जिल्ह्याची जनता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठीशी राहिली आहे. त्याची पुनरावृत्ती याही निवडणुकीत होईल.
राजेंद्र गवई म्हणाले, देशाची महत्वाची निवडणूक आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. दलित आणि अल्पसंख्याकांवर हल्ले वाढले आहेत. म्हणून या सरकारला उलथवून टाकायचे आहे. त्यामुळे खा. उदयनराजेंना निवडून द्यायचे आहे, असे त्यांनी सांगितले. परंतु मागील निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत सातारा आणि माढ्यात आघाडीचाच उमेदवार निवडून येईल व खर्या अर्थाने पक्ष सोडून गेलेल्या गद्दाराना जिल्ह्याची जनता जागा दाखवेल.
आ.आनंदराव पाटील म्हणाले, 2014 च्या निवडणुकीत मोदींनी स्वप्ने दाखवली. मात्र, एकही आश्वासन पूर्ण करता आले नाही. आज जिल्ह्यात भाजपला उमेदवार मिळाले नाही. आमच्या पक्षातले लोक घेऊन गेले.
भाजपची सत्तेची मस्ती दूर करणारच : खा. शरद पवारांची भाजपवर सडकून टीका
RELATED ARTICLES