सातारा : परळी खोर्यातील आरगडवाडी येथील रामचंद्र सखाराम मोरे (वय 54) यांचा गावानजीकच्या शेतीला पाणी देण्यासाठीच्या पंपाची मोटार पाण्यात सोडत असताना पाण्यातील झाडाझुडपात पाय अडकल्याने उरमोडी जलाशयात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे.
याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रामचंद्र मोरे यांची गावाजवळच बनग्याचे नावाचे शिवार आहे. याठिकाणी त्यांची शेती आहे.तर त्यापासूनच जवळ असणार्या उरमोडी जलाशयात त्यांच्या भावकीचा शेती पंप आहे. सोमवारी दुपारी 2.40 च्या रामचंद्र मोरे आणि अन्य दोनजण शेतीपंप चालू करण्यासाठी गेले होते. मात्र, यावेळी पंपात घाण अडकल्याने पंप बाहेर काढून पुन्हा पाण्यात सोडण्यासाठी ते पाण्यात उतरले होते.
त्यावेळी धरणाच्या काठापासून सुमारे 150 फूट आतमध्ये ते गेले होते. यावेळी त्याचे पाय पाण्यात असलेल्या झाडाझुडपात अडकल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांच्याबरोबर आलेल्या एकाने त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, त्यांना ते सापडले नाहीत. दुसर्यास पोहता येत नसल्याने त्याने आरडाओरडा केला. त्यामुळे परिसरातील इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य राबवले.
अर्ध्या तासाने त्यांना पाण्यातून बाहेर काढल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, रुग्णालयात त्यांना मृत घोषीत करण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. रामचंद्र यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना असा परिवार आहे. त्यांच्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.