सातारा : सोमवार पेेठ येथील ओढ्यावरील पुलाचे काम अर्धवट स्थितीत असल्याने तेथील नागरिकांचा ये – जा करण्याची गैरसोय झाली असून तेथील लहान मुलांच्या जीवितास धोका अस्याने पुलाचे काम तत्काळ सुरू करावे अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा सोमवार पेठ येथील नागरिकांनी जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, दि. 26 मे 2016 रोजी सोमवार पेठ येथील न्यु इंग्लिश स्कुल चौक ते दत्त चौक दरम्यान ओढ्यावरील पूल नवीन बांधकामासाठी तोडला आहे. सदर पूल तोडताना याची नागरिकांना पूर्व कल्पनाही देण्यात आली नाही. त्यामुळे सदर पूल तोडताना पाण्याची पाईपलाईन, टेलिफोन वायरिंग तोडफोड झाली असल्याने प्रचंड गैरसोयीला सामोरे जात असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. तसेच पूल अर्धवट स्थितीत असून त्याला कोणतेही संरक्षण न लावल्याने तेथील लहान मुलांचा जीवितास धोका होण्याची शक्यता असून या पुलाचे बांधकाम तत्काळ करावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.