औंध : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या येथील ग्रामनिवासिनी श्रीयमाईदेवी,श्री कराडदेवी,श्रीमूळपीठदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित शनिवार दिनांक 1आँक्टोंबर ते बुधवार दिनांक 12आँक्टोंबर अखेर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे अशी माहिती श्रीयमाई देवस्थानच्या चीफ टूस्टी (मुख्य विश्वस्त)श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी एका लेखी पत्रकाद्वारे दिली. दरम्यान सध्या औंध येथील राजवाडयातील कराडदेवी,ग्रामनिवासिनी श्रीयमाईदेवी मंदिर, मूळपीठ डोंगरावरील श्री मूळपीठदेवी मंदिरामध्ये व परिसरात सध्या नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. याठिकाणी स्वच्छता, रंगरंगोटी,विदयुतरोषणाई,धार्मिक विधीची ही जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती श्रीयमाई देवस्थान कार्यालयातून देण्यात आली.
रविवार दिनांक 2आँक्टोंबर ते शनिवार दिनांक 8आँक्टोंबर या कालावधी मध्ये नियमित सकाळी व रात्री महानैवेद्य,महाआरती,मंत्रपुष्पांजली,त्याचबरोबर नियमित ह.भ.प.गजाननबुवा कुरोलीकर यांचे रात्री 9वाजता सुश्राव्य कीर्तन होणार आहे.
याअगोदर मंगळवार दिनांक 4आँक्टोंबर रोजी सकाळी 12 वाजता महानैवेद्य, महाआरती,मंत्रपुष्पांजली तसेच देवीच्या पाटयापूजनाचा ,ओटी पूजनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच श्रीमूळपीठ डोंगर व ग्रामनिवासिनी श्रीयमाईदेवी मंदिरात ही देवीच्या ओटीभरणाचा कार्यक्रम होणार आहे.
रविवार दिनांक 9आँक्टोंबर रोजी अष्टमी उत्सवानिमित मूळपीठ डोंगरावर देवीची यात्रा भरविली जाणार आहे. यावेळी दुपारी देवीचे पूजन करून पालखीतून देवीची डोंगरावर मिरवणूक काढली जाणार आहे. यावेळी विविध देवतांना भेटी देऊन उपस्थित ग्रामस्थ, महिला,भाविकांना प्रसादाचे वाटप श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी व राजघराण्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. सोमवार दिनांक 10रोजी महानैवेद्य, महाआरती,मंत्रपुष्पांजली आदी कार्यक्रमाबरोबर देवीची घट उत्थापना कार्यक्रमाबरोबर कुमार कुमारी पूजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर नवरात्र पाठांची ब्राह्मण दक्षिणा ,सौ सुहासिनींना दक्षिणा खण साडी नारळाने ओटी भरणे,दक्षिणा देणे याकार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच नियमित दोन वेळेस वाद्यव्रूंदाची सलामी दिली जाणार आहे.
मंगळवार दिनांक 11रोजी सकाळी महानैवेद्य ,महाआरती,मंत्रपुष्पांजलीचा कार्यक्रम होणार आहे. तसेच राजवाडयातील शस्त्रपूजा केली जाणार आहे. त्यानंतर औंध येथील ग्रामस्थांना राजवाडयात दसरा उत्सवानिमित जेवण दिले जाणार आहे.
त्यानंतर औंध गावातील श्रीयमाईदेवीच्या उत्सव मूर्तीचे विधिवतपणे पूजन करून ,वाद्यव्रूंदाची सलामी देऊन देवीची पालखी सिमोल्लंघनासाठी निघणार असून औंध गावातील होळीचा टेक ,केदार चौक मार्गे गावाच्या उत्तरेकडील काजळवडानजीच्या सीमेवर देवीची पालखी नेऊन औंध संस्थानच्या अधिपती श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी व राजघराण्यातील मान्यवर, मानकर्यांच्या उपस्थितीत सोने लुटण्याचा कार्यक्रम होणार आहे. व त्यानंतर डब्बे लावून गोळीबार केला जाणार आहे. पालखी मिरवणूक परत मंदिर, राजवाडयात आल्यानंतर संस्थानच्या परंपरेनुसार दरबार भरविला जाणार असून यावेळी गवई गान,गुलाबपाणी,पानसुपारी देण्याचा तसेच दसर्यानिमित शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम होणार असून बुधवार दिनांक 12रोजी श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधींच्या उपस्थितीत मानकर्यांना बिदाग्या देऊन लळीताने या उत्सवाची सांगता होणार आहे. या उत्सवासाठी नियमित पौरोहित्यपठन गणेशशास्त्री इंगळे व वसंतराव देशपांडे करणार आहेत.