मायणी :- मायणी येथील मुख्य गाव बाजारपेठ व चांदणी चौक परिसराला जोडणारा पंढरपूर मल्हारपेठ राज्यमार्गावर असणाऱ्या मुख्य पुलाला भगदाड पडले असून या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने या घटनेकडे केलेल्या दुर्लक्षमुळे या ठिकाणाहून प्रवास करणारे हजारो विद्यार्थी , ग्रामस्थ ,प्रवासी यांचा जीवाला धोका निर्माण झाला आहे .
चांदणी चौक परिसरात अनेक वाड्या वस्त्या व अनेक शाळा ,कॉलेज आहेत या बरोबरच मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी मायणीतील नागरिकांना या पुलाचा वापर करावा लागतो . यासह या मार्गावर पंढरपूर ,सोलापूर,अकलूज,तसेच आंध्र प्रदेश राज्याकडे जाणारी हजारो ट्रान्सपोर्ट कंटेनर,ट्रक,डंपर,चारचाकी वाहने व दुचाकी वाहने दररोज धावत असतात . गेल्या दीड दोन महिन्यांपूर्वी या मार्गावरीलच गावालगत असणारा ब्रिटिशकालीन पूल कोसळला असून याची अद्याप सार्वजनिक बांधकाम खात्याने दखल घेतली नसून संबंधित खात्याच्या कोणत्याही अधिकाऱ्याने या कामासाठी तत्परता दाखवली नाही .या कोसळल्या पुलाच्या कठड्याजवळ कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाला या ठिकाणी लाल फित बांधून वाहन चालकांना सतर्कतेचा इशारा द्यावा या सारखे दुर्दैव कोणते !
सध्या मुख्य पुलावर मोठं मोठे खड्डे पडले असून यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करण्यात येत असताना त्याकडे या विभागाने दुर्लक्ष केल्यानेच त्या खड्ड्या मध्ये सातत्याने पाणी जाऊन त्याठिकाणी भगदाड पडले असून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली गांधारी ची भूमिका मोठया दुर्घटनेला खतपाणी घालत आहे . या प्रश्न संबंधी अधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही .याठिकाणी तातडीने लक्ष दिले नाही तर हजारो विद्यार्थी प्रवाशी यांचा जीव धोक्यात येणार आहे .
मायणीच्या संपूर्ण पंढरपूर मल्हारपेठ या मुख्य बाजारपेठेतील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून चांदणी चौक व परिसरातील हातावर पोट असणाऱ्या व्यवसायकांचे व्यवसाय तातडीने अतिक्रमणाच्या नावाखाली तोडण्यात त्यांना रस्त्यावर आणले. त्यावेळी त्या व्यावसायिकांच्या कोणत्याही सबबीला दाद न देण्याऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याने या दोन्ही पुलांच्या व सर्व गावातील खड्ड्याच्या दुरुस्ती कामी आपल्या कामाची तत्परता दाखवावी ,अशी संतप्त प्रतिक्रिया मायणीकरांनी व्यक्त केली