बड्या कलाकारांना आपल्या चित्रपटात घेण्याचे स्वप्न तर प्रत्येक निर्माता-दिग्दर्शकाचे असते. कधी कधी चित्रपटाची कथा लिहितानाच काही पात्रांमध्ये लेखकाला आपले कलाकार दिसू लागतात. पण हेच कलाकार आपल्याला त्या व्यक्तिरेखासाठी मिळतील याची काही शाश्वती नसते. यासाठी तारखा न जुळणे, कलाकाराला पटकथा न आवडणे यांसारखे अनेक कारणे असतात. अन यात सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे मानधन. नवोदित दिग्दर्शक किवा सिनेमासाचे लो बजेट असणार्यांना या गोष्टीचा नक्कीच अनुभव येतो. कलाकाराचे स्टारडम जेवढे मोठे तेवढे जास्त त्याचे मानधन. मग कथा चांगली असली तरी पुरेसे पैसे न मिळाल्याने चित्रपट सोडलेले अनेक मोठे स्टार्स आहेत. असाच प्रत्यय आलाय चौर्य सिनेमाचे दिग्दर्शक समीर पाटील यांना. यासंदर्भात त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, मी या चित्रपटाच्या कथेवर गेली 2 ते 3 वर्ष काम करीत आहे. कथा पूर्ण झाल्यानंतर मी जवळपास 70 ते 80 कलाकारांना भेटलो. अगदी बड्या स्टार्सला मी स्क्रिप्ट ऐकवली. सर्वांना कथा आवडायची परंतु, मानधनावर अडायचं. केवळ पुरेसे मानधन न मिळाल्याने चौर्यमध्ये काम करण्यास अनेकांनी नकार दिला. किशोर कदम यांनी चित्रपटाची कथा ऐकल्यावर लगेच चित्रपटात काम करण्यास होकार दिला. एवढेच नाही तर त्यांनी या सिनेमासाठी एक रुपयाही घेतला नाही. तर मिलिंद शिंदे यांनी देखील खूपट कमी पैशात हा चित्रपट केला आहे. आज इंडस्ट्रीमध्ये चांगले नाव कमावून देखील या कलाकारांनी स्टारडमचा गर्व न करता या सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.