Monday, May 19, 2025
Homeठळक घडामोडीदिल्लीत नरेंद्र आणि सातार्‍यातही नरेंद्रच

दिल्लीत नरेंद्र आणि सातार्‍यातही नरेंद्रच

सातारा : गेल्या दहा वर्षांपासून सातारा जिल्ह्याची विकास परंपरा खंडीत झाली आहे. दहशतीचे वातावरण, खंडणीबहाद्दरांचा सुळसुळाट आणि टोलधाडीमुळे जिल्ह्याचा औद्योगिक विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे. अपुरे सिंचन प्रकल्प, रोजगाराची समस्या यामुळे शेतकर्‍यांसह तरुण पिढीमध्येही अस्वस्थतेचे वातावरण आहे. अशा भीषण परिस्थितीत शिवसेना-भाजप आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला एक आशेचा किरण दाखवला आहे. पाटील यांच्या रुपाने जनतेच्या मनातला उमेदवार प्रस्थापितांच्या पुढे एक मोठे आव्हान बनून आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट यावेळी नरेंद्र पाटील यांच्या रुपाने सातारा जिल्ह्यातही धडकणार असा विश्‍वास महायुतीच्या कार्यकर्त्यांच्याकडून व्यक्त केला जात आहे.
नरेंद्र पाटील यांना त्यांचे वडील आणि माथाडी कामगारांचे आराध्य दैवत समजल्या जाणार्‍या अण्णासाहेब पाटील यांच्याकडून जनकल्याणाचा वारसा लाभला आहे. अण्णासाहेब पाटील यांनी आपले अवघे आयुष्य माथाडी कामगार तसेच मराठा समाजासाठी वेचले होते. मराठा आरक्षणाची मागणी सर्वप्रथम अण्णासाहेब पाटील यांनीच लावून धरली होती. त्यामुळेच मराठा आर्थिक विकास महामंडळाला त्यांचे नाव देण्यात आले होते. आज अवघ्या महाराष्ट्रातील माथाडी कामगार नरेंद्र पाटील यांना आपले दैवत अण्णासाहेब पाटील यांच्या रुपातच पाहतात. त्यामुळे माथाडींसह सातारा जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्यांचे वर्षानुवर्षे प्रलंबीत असणारे प्रश्‍न दिल्ली दरबारी मांडण्यासाठी नरेंद्र पाटील यांना मोठ्या मताधिक्याने खासदार बनवण्यासाठी प्रत्येकजण झटत आहे. नरेंद्र पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सातार्‍यात उफाळलेला जनसागर त्यांच्या यशाची जणू खात्रीच देत होता. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता भाजप आणि शिवसेनेचे हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपापसातील मतभेद विसरुन आता सातार्‍यात कोणत्याही परिस्थितीत विकास परिवर्तन घडवायचेच या हेतूने एकत्र आले होते.
कार्यकर्त्यांच्या या मनोमिलनामुळेच आज नरेंद्र पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असून ते पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे सातारा जिल्ह्याचा कानाकोपरा धुंडाळून काढत आहेत. अगदी सामान्यातील सामान्य माणसापर्यंत पोहचून नरेंद्र पाटील आपली भुमिका पटवून देत आहेत. नरेंद्र पाटील यांच्या प्रचाराला मतदारांच्याकडून मिळत असणारा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता आता ही निवडणूक सर्वसामान्य जनतेनेच हातात घेतली असल्याचा प्रत्यय येत आहे.
पुण्यानंतर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकास होत आहे. परंतु सर्व प्रकारची अनुकूल भौगोलिक परिस्थिती आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध असतानाही सातारा मात्र पिछाडीवर आहे. याला विद्यमान लोकप्रतिनिधीच मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत, असे नरेंद्र पाटील यांचे स्पष्ट मत आहे. आपली लढाई कोणा एका व्यक्तीशी नसून सातार्‍याला विकासापासून वंचित ठेवणार्‍या प्रवृत्तीशी असल्याचे ते सांगतात.
टोलनाके चालवण्यासाठी होणार्‍या हाणामार्‍या आणि उद्योजकांच्याकडून खंडणी मागणार्‍यांना पाठीशी घातले जात आहे. त्यामुळे ही दहशत मोडून काढण्यास आपण प्राधान्य देणार असल्याचे नरेंद्र पाटील आश्‍वासन देतात. लोकांच्या मनातील भावना बोलवून दाखवत असल्यामुळे त्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रामुख्याने पाटण, सातारा, जावळी, कोरेगाव तालुक्यातील माथाडी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांनी नरेंद्र पाटील यांनाच पुढील खासदार बनवण्यासाठी कंबर कसली आहे. इतर तालुक्यातही पाटील यांचा अफाट जनसंपर्क आणि राजकीय मित्र असल्यामुळे त्यांचा विजय तर निश्‍चित आहेच. आता फक्त मतमोजणीनंतरच्या मताधिक्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular