चाफळ : बोल बजरंग बली की जय,सीताराम की जय, प्रभु रामचंद्र की जय च्या जयघोषात गुलाल-खोबर्याची उधळण करीत हजारो भाविक-भक्तांच्या उपस्थितीत व सासनकाठ्यांच्या साक्षीने चाफळचा श्रीराम रथोत्सव मंगळवारी सुर्योदयाबरोबर उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. गुलालाने माखलेल्या युवक -युवतीं परस्परांना गुलाल लावण्यात रंगून गेलेले होते. ही वेळ नेमकी सुर्योदयाची असल्याने अरुणाचा लालिमा पूर्व क्षितिजावर पसरल्याने सर्वच वातावरण धुंद बनून गेले होते.
राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामींनी सन 1648 पासून सुरु केलेला श्रीरामनवमी उत्सव आजही अखंडितपणे तीर्थक्षेत्र चाफळ येथे सुरु आहे. चैत्र शुध्द प्रतिपदा ते एकादशी असा उत्सव सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात साजरा केला जातो. नवमी, दशमी, एकादशी हे उत्सवाचे मुख्य तीन दिवस मानले जातात. चैत्र शुध्द एकादशीला श्रीरामनवमी उत्सवाची सांगता होत असते. मंगळवारी पहाटे काकड आरती होऊन समर्थ वंशज गादीचे अधिकारी भूषण स्वामी यांच्या हस्ते श्रीरामाची महापूजा करण्यात आली. पहाटे पाच वाजता कीर्तनास प्रारंभ झाला. श्रीरामाची पट्टाभिषिक्त मूर्ती वाजत-गाजत पालखीतून दिवट्या, मशालीसह मंदीर प्रदक्षिणा घालून प्रभु रामाची मूर्ती सवाद्य चांदीच्या पालखीमधून रथाकडे आणण्यात आली. यावेळी समर्थ वंशज भूषण स्वामी यांच्या हस्ते रथाच्या चारही चाकावर नारळ फोेडल्यानंतर अधिकारी स्वामींच्या हस्ते चाफळसह भागातील बारा बलुतेदार व मानकरी यांचा मानाचे नारळ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सत् सीताराम की जय च्या प्रचंड जयघोषात रथ ओढायला सुरुवात झाली. रथासमोर चांदीची पालखी, सुवासिक फुलांच्या माळा, मानाच्या सासनकाठ्या, सजवलेले घोडे, शेकडो दिवट्या, समर्थाचे वंशज, उत्सवाचे मानकरी आणि हजारो भक्त प्रभुरामाचा जयजयकार करीत रथ ओढत होते.
मंदीरपासून निघालेला रथोत्सव सकाळी सुर्योदयावेळी कावेश्वरी मारुती मंदीर, महारुद्र स्वामींच्या समाधीमंदीर बसस्थानकाजवळ पोहचल्यानंतर तेथून परत पुन्हा मंदीराच्या पायथ्यापर्यत आणण्यात आला. संपूर्ण रथ नवसाचे नारळ व नोटांनी झाकोळला होता. रथोत्सवासाठी चाफळसह परिसरातील भाविकांनी पहाटेपासूनच मंदीरात हजेरी लावली होती. डोळेगाव, पाडळी व अंगापूर येथील मानाच्या सासनकाठ्या सहभागी झाल्या होत्या. गुलालमय वातावरणामध्ये लहानांपासून थोरांपर्यत सर्वच मंडळी दंगून गेली होती. श्रीराम मूर्ती पालखीतून मंदीरात आणल्यानंतर दरवाज्यातच दही, भात व नारळचा नैवेद्य म्हणून म्हसोबाला दिला जातो. सुवासिनी पंचारती ओवाळतात. व पालखी मंदिरात आल्यानंतर लळीत सुरु होते. श्रीराम रावण वध करुन लंकेहून विमानातून आयोध्येस परत आल्यावर त्यांच्या राज्याभिषेकाचा महोत्सव झाला. त्यावेळी वानरराज सुग्रीव, वैद्यराज, जांबुवंत, हनुमंत, नळ, नीळ आदी वानरवीर, श्रीरामांचे प्रधान मंडळ, जनकादिराजे व वशिष्ठ, विश्वामित्रादि मुनीवर उपस्थित होते. यावेळी श्रीरामांनी सर्वाना प्रेमपूर्वक अलिंगन देऊन सर्वाना मौल्यवान भेटी देवू केल्या. त्याचप्रमाणे या उत्सवाच्या सांगता कार्यक्रमातही लळित झाल्यावर उत्सवातील सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार अधिकारी स्वामींच्या हस्ते करण्यात आला.
रथोत्सवाच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीला समर्थ वंशजाची सकाळी नगरप्रदक्षिणेने भिक्षावळ झाली. रात्री 8 वाजता रथाचे मानकरी साळुंखे बंधुंनी विमानरुपी प्रतिकृतीची रथामध्ये प्रतिष्ठापना केली. 9 वाजता जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती राजेश पवार यांच्यातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे शोभेच्या फटाक्यांची भव्य आतषबाजी करण्यात आली. श्रीरामनवमी उत्सव सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्रीराम देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच तसेच यात्रा मध्यवर्ती कमिटीचे सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ मंडळ यांनी विशेष परीश्रम घेतले.
मानाची सासन काठी पेलतिया तिसरी पिढी
राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामींनी सन 1648 पासून सुरु झालेल्या श्रीरामनवमी उत्सवात आजही अंगापूर, पाडळी, डोळेगाव येथील मानाच्या सासन काठ्या सहभागी होत असतात, आज या मानकर्याची तिसरी पिढी यात्रेत येत आहे, यामध्ये अंगापुर येथील अमृता कोळी, हणमंत कणसे, दीपक कणसे, नंदा चव्हाण, पोपट चव्हाण,आनंद कणसे, आकुबा कणसे, धनाजी कणसे, ज्ञानु कणसे, किसन कणसे, पाडळी येथील नामदेव देशमुख, चंद्रशेखर बाचल, अभिजित बाचल, जोतिराम ढाणे तरडोळेगाव येथील अमोल कदम, रवींद्र गोडसे, निखिल गोडसे, जोतिबा गोडसे यांचा सहभाग होता.
तीर्थक्षेत्र चाफळचा रथोत्सव उत्साहात
RELATED ARTICLES