Monday, April 28, 2025
Homeठळक घडामोडीडॉ.आंबेडकर शाळा प्रवेश दिन "विद्यार्थी दिवस" म्हणून घोषित ; अरुण जावळे यांच्यावर...

डॉ.आंबेडकर शाळा प्रवेश दिन “विद्यार्थी दिवस” म्हणून घोषित ; अरुण जावळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव!

सातारा :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक प्रवासाचा आरंभ सातारा येथून झाला. 7 नोव्हेंबर 1900 रोजी त्यांनी इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला. या दिनाचे औचित्य व महत्व विचारात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाच्या स्मृती जागवण्याच्या उद्देशाने पत्रकार अरुण जावळे दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळाप्रवेश दिन सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करतात. हा दिवस शासनाने महाराष्ट्रातील शाळा महाविद्यालयातून साजरा करावा यासाठी मंत्रालय स्तरावर अरुण जावळे झटत होते. अखेर शासनाने 7 नोव्हेंबर डाँ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन मविद्यार्थी दिवस म म्हणून साजरे करावे असा जी आर काढला. राज्यपालांच्या आदेशान्वये शालेय उच्च शिक्षण मंत्रालयाने हा निर्णय घेतला.
सन 1900 ते 1904 या कालावधी दरम्यान त्यांचे बालपण साता-यात गेले. येथील ऐतिहासिक अशा राजवाड्याच्या भव्यदिव्य वास्तूत असणा-या सातारा हायस्कूल मध्ये ( सध्याचे छत्रपती प्रतापसिहराजे हायस्कूल ) 7 नोव्हेबर 1900 रोजी त्यांनी इयत्ता पहिलीच्या ( इंग्रजी ) वर्गात प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांचे नाव भीमा असे होते. हायस्कूलच्या रजिस्टरला 1914 या क्रमांकासमोर आजही बाल भीमाची स्वाक्षरी आहे. दरवर्षी याठिकाणी असंख्य लोक उपस्थित राहून ज्या मातीमध्ये डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाऊलांचे ठसे उमटले त्या मातीला आभिवादन करतात.
मागील 15 वर्षापासून 7 नोव्हेबर हा दिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येत आहे. हा दिवस महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमधून साजरा करावा यासाठी विलासराव देशमुख यांच्यापासून ते विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत अनेक मंत्र्यांना अरुण जावळे भेटले. शासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा करुन या दिवसाचे महत्त्व शासनाच्या समोर मांडले. हा जी आर काढण्याबाबत केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री ना. रामदास आठवले, बबन कांबळे, महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, शालेय उच्च व शिक्षणमंत्री विनोद तावडे, रिपाइं राष्ट्रीय सचिव अविनाश महातेकर, भीमराव सावतकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
शाळा प्रवेशासंबधी अरुण जावळे यांनी म्हटले आहे , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शाळेत पाऊल पडलेच नसते तर ते सुशिक्षित व प्रज्ञावंत होणे शक्य नव्हते. महत्वाचे म्हणजे जगात ज्याचे आजही स्वागत केले जाते ते लोकशाहीप्रधान संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून निर्माण झाले नसते. परिणामतः मानवी स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक न्याय आणि मानवी मुल्यांची पावला पावला हत्या झाली असती. शिवाय शेकडो वर्षे जाती व्यवस्थेच्या एकदम तळाला गटांगळ्या खाणा-या माणसाचे प्राण वाचून त्याला म माणूसपणफ मिळाले नसते. वंचित, उपेक्षितांवर दुःख – दैन्य – दारिद्रयाचे डोंगर कोसळतच राहिले असते. म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश युगांतराची चाहूल देणारी व इतिहासाला कूस बदलावयास लावणारी क्रांतिकारक घटना आहे.
दरम्यान हा जी आर निघाल्यानंतर महाराष्ट्रभरातून अरुण जावळे यांचे अभिनंदन होत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular