सातारा : कराड व पाटण तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून ऊसाची गुर्हाळ गृहे आजही टिकून आहेत. मजुरांची टंचाई व गुळवे यांच्या वाढीव पैशाच्या हजेरीमुळे ऊसाची गुर्हाळ गृहाचे मालक हवालदिल झाले आहेत. बाजारपेठेत गुळाला जर चांगला भाव मिळाला तर शेतकर्यांचा ऊस गाळपासाठी गुर्हाळ गृहात वाढता पाठींबा मिळत असतो अशी माहिती कराड-ढेबेवाडी रोडवर चचेगाव येथे ऊसाच्या शेतात गेल्या 10 वर्षापासून गुर्हाळगृह सुरु असलेले मालक अशोक घोरपडे (आप्पा) यांनी दै. ग्रामोध्दार प्रतिनिधीशी बोलताना दिली.
कराड तालुक्यात चचेगाव, येरवळे, केसे, वारुंजी, सुपने, वसंतगड, साकुर्डी, टेंभू, कोरेगाव तर पाटण तालुक्यात निसरे या ठिकाणी ऊसाची गुर्हाळ गृहे आजही सुरु आहेत. साधारण दसर्यापासून ही गुर्हाळगृहे सुरु केली जातात. ऑक्टोंबर, ते मे अशी 7 ते 8 महिने रात्रंदिवस गुर्हाळगृहे सुरु असतात. विजेच्या खंडीत पुरवठा अधून-मधून होत असल्याने गॅसच्या बत्तीवर कामकाज सुरु असते. बीड, बार्शी या ठिकाणाहून दरवर्षी मजूर व गुळवे यांना बोलविले जाते. गुळव्याचा एका काईलला 750 रुपये भाव असतो. दिवसाला साधारण 5 ते 6 काईल काढल्या जातात. यामधून 30 किलोच्या 6 गुळाच्या ढेपा पाडल्या जातात. 10 बाय 10 आकारातील काईल 750 लिटर ऊसाचा रस टाकून पाचटीला साहय्याने हा रस शिजवून गुळ तयार केला जातो.
शेती उत्पन्न बाजार समिती कराड येथे उत्पादित केलेल्या गुळाच्या ढेपेचा व्यवहार केला जातो. 3500 ते 4000 रुपये गुळास क्विटंलला भाव सध्या मिळत आहे. मजूर, ऊस तोडणीसह लाईट बिल, पाणी बिल खर्च वजा जाता 400 ते 500 रुपये नफा गुर्हाळगृहातून होत असतो. स्थानिक मजुरांकडे गुर्हाळगृहाबाबत फारशी माहिती नसल्याने बाहेरुन मजूर आयात करावे लागतात. वाढती महागाई व स्पर्धेच्या युगात मात्र, पारंपारिक ऊसाची गुर्हाळगृहे टिकून आहेत हे मात्र निश्चित.