सातारा : सातारा पंढरपूर रस्त्यावरील माहुली येथील 1915 साली बांधण्यात आलेल्या कृष्णा नदीवरील पुलाची मुदत संपली. त्यानंतर महाड नजीक सावित्री नदीवरील पूल कोसळल्याने संपूर्ण राज्यातील पुलाच्या देखभाल दुरुस्तीचे आदेश देण्यात आले. मात्र सातारा जिल्ह्यातील ब्रिटीशकालीन 140 मी. लांबीच्या व 7 गाळे असलेल्या कृष्णा पुलाच्या डागडुजीची जबाबदारी सध्या अवघ्या दोन खासगी मजूर गवत काढून करत आहेत. यामुळे बांधकाम विभाग किती गंभीर आहे याची चुणूक प्रवाशांना पाहण्यास मिळत आहे.
101 वर्षापूर्वी न्या. रामशास्त्री प्रभुणे यांच्या क्षेत्रमाहुली या गावानजीक ब्रिटीश अधिकारी विल्सन यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या पुलाचे चुना, दगड व बॉलबेरींग साहित्याने बांधकाम करण्यात आले. त्यानंतर या पुलावरुन अनेक पाईप घेऊन जाण्यासाठी सिमेंटचे बांधकाम झाले. परंतु, सध्या पुलाच्या दोन्ही बाजूला झाडेझुडपे उगवली असून अनेक भाविक या पुलानजिक कचरा व निर्माल्य टाकत असल्याने या ठिकाणी पक्षांचे थवे दिसून येतात. डाव्या बाजूच्या कठड्याचे दगड निखळून पडले आहेत. या ठिकाणी गवत साठल्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडू शकते. बांधकाम विभागाचे एक अधिकारी रात्री येऊन गेले. त्यानंतर सकाळी दुसरे रावसाहेब येऊन गेले. कागदोपत्री पुलाची देखभाल दुरुस्तीचे चित्र रंगवल्यानंतर हा कागद बांधकाम विभागाकडे देण्यासाठी ते निधून गेले. दीडशे मी. लांबीच्या पुलाच्या देखभाली दुरुस्तीसाठी एक कर्मचारी तैनात असून सध्या दोन खासगी मजुरांच्या मदतीने पुलावरील रस्त्याच्या दुतर्ङ्गी असलेले गवत काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या पुलावरील रस्त्याची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे.
कोकणातील सावित्री नदीच्या दुर्घटनेमुळे सातारकरांना दिलासा देण्यासाठी ऐतिहासिक ब्रिटीशकालीन कृष्णा पुलावरील देखभाल दुरुस्ती अपेक्षित आहे. परंतु वाहनचालक व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे सध्या गवत काढून पुलाची दुरुसती होत आहे हे पाहणे नशिबी ठरले आहे. सध्या राजकीय आखाडा गाजत असून अनेकजण या पुलावरुन ये जा करतात. मात्र कोणीही वाहनचालक या बाबत सूचना अथवा मार्गदर्शन करण्यासाठी थांबत नसल्याने या पुलालासुद्धा आश्चर्य वाटू लागले आहे. दरम्यान निधीअभावी नवीन पुलाचे बांधकाम करता येत नाही. अशा वेळी जुन्या पुलाच्या देखभालीसाठी निधी कोठून आणणार? असा प्रश्न बांधकाम विभागाला पडला आहे. सातार्यातील बांधकाम विभाग काहीजणांना ठेकेदारीसाठी दलालीचा पूल झाला आहे. त्यानीतरी आपलं वजन वापरावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.