सातारा : जात – पात मला माहित नाही आणि मी जातभेद मानतही नाही. माणूस हीच माझी जात, असे जाहीर करून खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी वंचित या शब्दाचा मला प्रचंड राग येतो. हा शब्दच आपणास हद्दपार करायचा आहे. शिक्षणापासून, चांगल्या संधीपासून, अधिकारापासून आणि आदर्श जीवनशैलीपासून कोणीही वंचित राहू नये, म्हणून या निवडणुकीत सत्तांतर घडवा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या निवडणुक प्रचारार्थ येथील कल्याण रिसॉर्टमध्ये परिवर्तनवादी, पुरोगामी चळवळीतील विविध 19 दलित संघटनाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा मंगळवारी सायंकाळी झाला. त्यात उपस्थित समाजबांधवांशी संवाद साधताना खा. उदयनराजेंनी हे मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे, रिपाई गवई गटाचे जिल्हाध्यक्ष ऍड प्रभाकर कांबळे, रिपब्लिकन पक्षाच्या कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष युवराज कंबळे जनता क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने, भीमशक्ती संघटनेचे प्रदेश सचिव बाळासाहेब शिरसाठ, जेष्ठ रिपाई नेते अप्पासाहेब गायकवाड, रिपाई ब्लू फोर्स संघटनेचे दादासाहेब ओव्हाळ, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भिसे, जिल्हा परिषदेचे माझी सदस्य संदिपभाऊ शिंदे नगरसेवक बाळासाहेब खंदारे, रामभाऊ हदगे माझी उपनगराध्यक्ष मुरलीधर भोसले, भाऊ दळवी, पंचायत समिती सदस्या अलका बोभाटे, नंदाताई भिसे, स्वाभिमानी रामोशी महासंघाच्या प्रियाताई नाईक, सुनंदा मोरे, सुनीता देसाई, वनिता जाधव, वनिता भंडारी, मिराताई बोरगावे, रुपाली भिसे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती,
आज एकविसाव्या शतकातही एखादि व्यक्ती त्याच्या नैसर्गिक आणि मूलभूत हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रकार होत असेल, तर हा अधिकार संबंधितांना कोणी दिला ? असा सवाल उपस्थित करून खा. उदयनराजे या मेळाव्यात पुढे म्हणाले की, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला राज्यघटनेची देणगी दिली आणि एक व्यक्ती ; एक मत अशी संकल्पना मांडत सर्वांना समान अधिकार मिळतील अशी व्यवस्था केली, स्वतंत्र भारतात आपण सर्वजण समान आहोत जितका मला अधिकार आहे. तितकाच तुम्हा सर्वानाही आहे. त्यामुळे कोणी अधिकाराचा अतिरेक करत असेल तर ते सहन करू नका. घटनेनुसार प्रत्येक व्यक्ती निवडणुकीस उभा राहू शकतो. मात्र सर्वजण निवडणुकीत उभे राहत नाहीत. दर पाच वर्षांनी होणार्या या लोकशाही उत्सवाकडे एक चळवळ म्हणून पहा. जनतेची दिशाभूल करणार्या सध्याच्या सरकारला त्याची जागा दाखवून देण्याची लोकशाहीतील राजा असणार्या मतदारांनी आता निर्धार करावा मन की बात सांगत जनतेला भुलवणार्या व खोटी आश्वासने देत फसवाफसवी करणार्यांना कायमस्वरूपी धडा शिकवा व लोकशाही वाचवा
दोन कोटी तरुणांना दरवर्षी रोजगार देऊ, प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करू, असे सांगत सत्ता संपादन केलेल्या सरकारने मोठ्या विश्वासाने सत्ता दिलेल्या जनतेचा केसाने गळा कापला असा आरोप करून खा उदयनराजे म्हणाले की, चुकीच्या आणि मनमानी कारभारामुळे सध्या देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. देशातील प्रत्येक गाव, तालुका, जिल्हा आणि राज्यसुद्धा अंधारात ढकलण्याचा उद्योग हे सरकार करीत आहे. देशाचे नंदनवन करण्याचे आमिष आपणास दाखवले होते, मात्र प्रत्यक्षात मातेरे झाले. शिवरायांची स्वराज्याची संकल्पना आणि बाबासाहेबांनी राज्यघटनेतून मांडलेला समतेचा विचार मोडून- तोडून हुकूमशाही आणण्याचे पाप करणार्या सरकारला धडा शिकवा आणि पुरोगामी विचारांची ताकत दाखवून द्या. नैसर्गिक वायू , तेल आणि पाण्याचे साठे हडपलेल्या उद्योगपतींनी या सरकारच्या वरदहस्ताने कमावलेली संपत्ती देशाच्या वार्षिक बजेटपेक्षा कितीतरी अधिक आहे. या पैशाच्या व्याजावर गोरगरिबांना मोफत शिक्षण निवारा अन्न आणि आरोग्यसुविधा उपलब्ध करून देत येतील. ज्या क्रांतिभूमीत अनेक चळवळी जन्मास आल्या, त्या सातारा जिल्ह्यातील क्रांतिकारी मतदारांची शक्ती मतदानाच्या पवित्र अधिकारद्वारे दाखवून मुजोर हुकूमशाहांना धडा शिकवण्यासाठी भीमसैनिकांसोबत खांद्याला खांदा देऊन पाठीशी उभे राहताना काकणभर अधिक योगदान देण्यात कुठेच कमी पडणार नाही
सुनील काटकर यांनी प्रस्ताविक केले, माजी पंचायत समिती सदस्य प्रवीण धस्के यांनी सूत्रसंचालन तर, समृद्धी जाधव यांनी आभार मानले. या मेळाव्याच्या प्रारंभी रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते व पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष किशोर तपासे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. डॉ. अमोल कोल्हे हे माझे अभिनय क्षेत्रातील मित्र असून त्यांना ते पूर्वी ज्या जातीयवादी पक्षात होते, तिथे केवळ ओबीसी असल्याने घुस्मटिला सामोरे जावे लागले. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, अशी आठवण संदीपभाऊ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात सांगितली. मिशीला पीळ देणार्या नव्हे, तर राजाश्रय देणार्या उमेदवाराची गरज असल्याचे संजय गाडे यांनी त्यांच्या भाषणातून सांगितले तर अठरा पगड जाती- धर्माच्या व्यक्तींना एकत्रित करून शिवरायांनी स्वराज स्थापले, तोच वारसा उदयनराजे पुढे चालवीत आहेत, असे रामदास कांबळे, यांनी सांगितले. गौतम वाघमारे, दादासाहेब ओव्हाळ , बाळासाहेब शिरसाठ, बाळासाहेब चव्हाण , युवराज कांबळे, अनिल लोंढे आदींचीही या वेळी भाषणे झाली.
या मेळाव्यात छत्रपती युवा सेनेचे सातारा तालुकाध्यक्ष शंभूराज नाईक व कोरेगाव शहर कार्याध्यक्ष गौरव खवळे यांना श्री. छ. उदयनराजेंच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.कार्यक्रमास संत रोहिदास चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सतीश रावखंडे, विलास रणखांबे, शाहिर प्रकाश फरांदे, राजरतन कांबळे, आनंदराव पवार, अरुणराव पवार, दिलीप कांबळे, सी.जे. कांबळे, जैतुन भाभी, आदींसह विविध संघटनांचे प्रतिनिधी व दलित समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माणूस हीच माझी जात : खा. उदयनराजे भोसले
RELATED ARTICLES