साताराः गदिमा म्हणजे ग.दि. माडगूळकर हे अष्टपैलू नाही तर दशपैलू व्यक्तिमत्व होते. कवी, कथा-पटकथा, संवादलेखक, अभिनेते आदी अनेक कलाप्रांतांत एकाचवेळी लीलया संचार केलेले गदिमा हे आत्मभान ठेवून आत्मज्ञानाने तत्वज्ञान सांगणारे कवी होते असे मत कवी राजन लाखे यांनी व्यक्त केले.
ते येथील नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये मसाप, शाहुपुरी शाखा आयोजित सातव्या मराठी भाषा पंधरवडयाच्या समारोपानिमित्त गदिमा एक आठवण, एक साठवण या विषयावर बोलत होते. व्यासपीठावर विनोद कुलकर्णी, नंदकुमार सावंत, डॉ. उमेश करंबेळकर आणि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना कवी लाखे म्हणाले, जगाच्या पाठीवर जेथे जेथे म्हणून मराठी बोलले, वाचले, लिहिले जाते तेथील मराठी भाषा प्रेमिकांनी गदिमा म्हणजेच ग.दि. माडगूळकर यांना आपल्या मनात मानाचे स्थान दिले आहे. चित्रपट, कथा, पटकथा, संवाद, गाणी या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी चिरस्मरणीय कामगिरी करुन रसिकांसाठी कधी न संपणारा ठेवा ठेवलेला आहे. गाणी, पदे या प्रांतातील प्रत्येक प्रकार हाताळून त्यातील सर्वोत्तम आपल्याला दिले आहे. भावगीत, भक्तीगीत, कोळीगीत, बालगीते, समर गीते, लावणी, कविता इत्यादी प्रकारातील उच्च कोटीतील साहित्य त्यांनी मराठी रसिकांना भरभरुन दिले. यावेळी श्री. लाखे यांनी त्यांच्या जीवनप्रवासाचे वर्णन अतिशय समर्पक शब्दात सांगितले.
त्यांच्या कविता सादर करुन प्रत्येक कवितेतून त्यांना काय म्हणायचे होते हे उपस्थितांना सांगितले. त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोच्च रचना म्हणजे गीतरामायण. रामायण कथेतील एक एक प्रसंग त्यांनी गीतांच्या रुपात तसेच बाबूजींच्या संगीत साथीत गीत रामायण या कार्यक्रमात उलगडून ऐकविला. 56 गाण्यांतून त्यांनी रामायण घराघरात पोहचवलं. निर्माता, कथाकार, गीतकार, पटकथाकार, संवाद, लेखक, अभिनेता अशा विविध भूमिकेतून त्यांनी चित्रपट सृष्टीला भरभरुन दिले. अव्दितीय प्रतिभा संपन्नता तसेच शब्दप्रभुत्वता या दोन्ही गोष्टींच्या सहाय्याने त्यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवून त्यांच्या मनावर राज्य केले. कानसेनांना मोहिनी घालणारे सोपे तसेच भावनांनी भारलेले शब्द त्यांच्या प्रत्येक गीतातून रसिकांचा श्रवणनाद व्दिगुणित करतात. त्यांच्या ठायी असलेली शब्दातील आशयघनता तसेच शब्दावरील हुकुमत यामुळे त्यांचे प्रत्येक गीत रसिकांच्या मनाला भिडायचे. गीत लेखनावरील सर्व प्रकारावर त्यांची हुकुमत होती. एखाद्या प्रसंगाला अथवा भावनांना अलवार शब्दात लपेटून रसिकांसमोर सादर करण्याची विलक्षण हातोटी त्यांच्या ठायी होती. यावेळी श्री. लाखे यांनी त्यांच्या आजही प्रसिध्द असलेल्या कविता, गाणी यांची उदाहरणे दिली. प्रत्येकाच्या जीवनाला काही ना काही देणारे गदिमा होते. शब्दसौंदर्य, शब्दसामथर्यांचे ते प्रतिक होते असे मत श्री. लाखे यांनी यावेळी व्यक्त केले.
प्रारंभी संयोजकांच्यावतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक विनोद कुलकर्णी यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार नंदकुमार सावंत यांनी मानले. कार्यक्रमास साता-यातील रसिक मोठया संख्येने उपस्थित होते. मराठी भाषा पंधरवडा यशस्वी करण्यासाठी मसाप, शाहुपुरी शाखेचे पदाधिकारी, गुजराथी अर्बनचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
गदिमा आत्मभान ठेवून आत्मज्ञानाने तत्वज्ञान सांगणारे कवी ः राजन लाखे, मराठी भाषा पंधरवडयांचा समारोप
RELATED ARTICLES