महादरे तलावाची पाणी पातळी घटली
सातारा : सातारा शहराला पाणी पुरवठा होणार्या कास तलाव पाणी योजना व शहापूर पाणी योजनेतून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. तर शहराच्या काही भागाला पाणीपुरवठा करणार्या महादरे तलावाची पाणी पातळी कमी झाल्याने ऐन उन्हाळ्यात शहराला तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहराला पाणी पुरवठा करणार्या कास पाईप लाइनच्या दुरूस्तीमुळे तर शहापूर पाणी योजनेची गळती रोखण्याचे काम सुरू असल्याने पाणी पुरवठा विस्कळित झाला आहे. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहापूर योजना पालिका कर्मचारी चालवत होते. आता या योजनेचा ठेका एका खासगी ठेकेदाराला दिल्याने शहापूर पाणी योजनेचा बोजवारा उडाला आहे. शहापूर योजनेच्या पाण्याच्या टाकीची पातळी सातत्याने कमी झाल्याने नियोजित वेळेत ती पूर्ण क्षमतेने पाण्याच्या टाक्या भरल्या जात नाहीत. त्यामुळे शहरात पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे.
पालिका प्रशासनाने शहापूर योजनेचा ठेका पुन्हा त्याच वादग्रस्त ठेकेदाराला का? दिला याबाबत उलट-सुलट चर्चा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. शहापूर पाणी पुरवठा योजनेला पाणी मुबलक असतानाही पूर्ण क्षमतेने उपसा केला जात नसल्याने नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. पालिका प्रशासन, पदाधिकारी त्या ठेकेदाराला समज का देत नाहीत? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. शहरातील दोन्ही नेत्यांनी शहापूर पाणीपुरवठा योजनेत लक्ष घालून त्या ठेकदाराची कानउघडणी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
कास तलाव व शहापूर पाणी योजनेतून कमी दाबाने पाणीपुरवठा
RELATED ARTICLES