सातारा : प्रशासनाच्यावतीने आवश्यक ती मदत आणि सहकार्य करण्यात येत आहे. त्याबाबत सर्व तयारी पूर्ण झाली आहे. न्यायमूर्ती कोचर आयोगाच्या अहवालानुसार मांढरदेव यात्रेबाबत सर्व जबाबदारी मांढरदेव देवस्थान विश्वस्तांनी स्वीकारुन नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी आज दिल्या.
श्री काळुबाई देवीची यात्रा व धावजी बुवा यात्रेच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी श्री. मुद्गल यांनी सर्व संबंधित यंत्रणांची आढावा बैठक मांढरदेव येथे आज घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, भोरच्या प्रांताधिकारी मोसमी बर्डे, तहसीलदार अतुल म्हेत्रे, भोरच्या तहसीलदार वर्षा शिंगण आदी उपस्थित होते.
तहसीलदार अतुल म्हेत्रे यांनी स्वागत केले. यानंतर यात्रेच्या नियोजनाबाबत उपस्थित विभाग प्रमुखांनी आढावा सादर केला. यावेळी जिल्हाधिकारी श्री. मुद्गल यांनी उत्पादन शुल्क विभागाला अवैध दारु निर्मिती, विक्री आणि वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. ते पुढे म्हणाले, अवैध दारु विक्री करणार्या संशयास्पद व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी. यात्रा कालावधीत घरगुती सिलेंडरचा वापर होणार नाही त्यासाठी पुरवठा पथकाने तपासणी करावी. यात्रा कालावधीत भारनियमन राहणार नाही. याची काळजी महावितरणने घेऊन काय करावे काय करु नये याबाबत फलक लावावेत. त्याचबरोबर अन्न व औषध विभागाने अधिकृत परवाने देवून फलकांच्या माध्यमातून सूचना कराव्यात.
आरोग्य विभागाने संयुक्तीकपणे आवश्यक ती खबरदारी घेऊन प्रथमोपचार पथक, अत्यावश्यक सेवा याबाबत नियोजन करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या बाजुला पडलेले दगड, अनावश्यक साहित्य काढून घ्यावेत. वळणाच्या मार्गावर रिफ्लेक्टर लावावेत. एसटी महामंडळाने वाहतुकीसाठी नवीन बसेस ठेवाव्यात. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी एसटीमध्ये घेवू नये. तसेच निरव्यसनी वाहन चालकांची नेमणुक करावी. पाणी पुरवठा विभागाने पाण्याची किती गरज आहे, किती उपलब्ध करता येईल याचे नियोजन करावे. पुरेसे पाणी उपलब्ध ठेवण्याच्या दृष्टीकोनातून देवस्थान समितीने नियोजन करावे.
यात्रा कालावधीत निर्माण होणार्या कचर्याच्या निर्मुलनासाठी वाई नगरपालिका, पाचगणी नगरपालिका यांनी सहकार्य करावे त्याचबरोबर मांढरदेव ग्रामपंचायतीने ठरवून दिलेल्या निकषानुसार खड्डा काढून कचर्याची विल्हेवाट लावावी. तसेच रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही, विनापरवाना स्टॉल लागणार नाही याची काळजी ग्रामपंचायतीने घ्यावी. वाहनतळ भाडे तसेच यात्रा कर शुल्क एकाच ठिकाणी ग्रामपंचायतीने वसूल करावी त्यात कोणतीही वाढ करु नये, अशा सूचना देवून अग्नीशामन दल, अग्नीशामक यंत्रे याची व्यवस्था देवस्थान समितीच्या वतीने करावी. सर्व यंत्रणांनी समन्वयाने यात्रा सुरळीत होण्यासाठी सतर्क रहावे, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या. प्रांताधिकारी श्रीमती मोरे यांनी सर्वांचे आभार मानले.