सातारा : 2014 च्या विधानसभा निवडणूकीत तालुक्यातील जनतेने माझेवर विश्वास ठेवून विश्वासाने माझे खांदयावर तालुक्याच्या प्रलंबीत विकासाचा भार दिल्यानंतर सत्ताधारी पक्षाचा एक आमदार म्हणून गत तीन वर्षात 310 कोटीहून अधिक विकासनिधी पाटण तालुक्याच्या विकासाकरीता शासनाकडून खेचून आणला आहे. तालुक्यातील प्रत्येक गांवात जाईल तिथे सध्या विकासकाम सुरु आहे. 2004 ते 2009 या पाच वर्षाच्या काळात एकूण 217 कोटी रुपयांचा विकासनिधी विरोधी पक्षाचा आमदार असूनही मी तालुक्यात आणला होता. केलेल्या विकासकामांच्या जोरावरच 2009 च्या निवडणूकीत मते मागितली पण विरोधकांच्या भूलथापांनी जनतेचा घात केला आणि 580 मतांनी मला घरी बसावे लागले.तरीही मी हार मानली नाही पराभवाच्या दुस-या दिवशी कामाला लागलो म्हणून 2014 ला मोठया मताधिक्कयाने तालुक्यातील जनतेने मला आमदार केले. येणारी विधानसभेची निवडणूक कधी होईल सांगता येत नाही तरीही येणा-या निवडणूकीत विकासकामांच्याच जोरावरच मतदारांना आपण मते मागायची आहेत, कारण विरोधकांनी गत तीन वर्षात जनतेला दिले काय? देण्यासारखे त्यांचेकडे आहेच काय ? सत्ताधारी पक्षाचे अनेक वर्षे आमदार असताना,सत्तेत पाच वर्षे मंत्री असताना हातात देणेसारखे असतानादेखील ते देवू शकले नाहीत याचा विचार तालुक्यातील जनतेने करावा असे आवाहन आमदार शंभूराज देसाई यांनी करुन विरोधकांना चांगलाच टोला लगाविला.
दौलतनगर ता.पाटण येथे उत्कृष्ट संसदपटु आमदार यांचे 51 व्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा लक्ष्य विधानसभा 2019 करीताच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सभेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मॉसाहेब श्रीमती विजयादेवी देसाई, सौ.स्मितादेवी देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, सौ.अस्मितादेवी देसाई, यशराज देसाई, जयराज देसाई, आदित्यराज देसाई, कु.ईश्वरी देसाई हे सर्व कुटुंब तसेच कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, शिवदौलत सहकारी बँकेचे चेअरमन डॉ.मिलींद पाटील, शिवसेना सातारा जिल्हा उपजिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,पंचायत समिती गटनेते पंजाबराव देसाई, माजी उपसभापती डी.आर. पाटील, जि.प.सदस्य विजय पवार, आशिष आचरे, सौ.सुग्रा खोंदू यांच्यासह देसाई कारखान्याचे व बँकेचे सर्व संचालक मंडळ, पंचायत समिती सदस्य व विविध संस्थांचे प्रमुख पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, पाटण मतदारसंघातील जनतेने मला 2014 च्या विधानसभा निवडणूकीत ज्या विश्वासाने मतदारसंघाचा आमदार केले त्या सर्वसामान्य जनतेच्या विश्वासास पात्र राहूनच मी गत तीन वर्षापासून मतदारसंघात काम करीत आहे. सत्ताधारी पक्षाचा एकमेव जिल्हयातील आमदार म्हणून मी सातारा जिल्हयात सर्वाधीक विकासनिधी मतदारसंघातील प्रलंबीत विकास कामांना शासनाकडून गत तीन वर्षात मंजुर करुन आणला आज त्या निधीच्या माध्यमातून विविध विकासकांमे तालुक्याच्या कानाकोप-यात सुरु असलेली आपल्याला दिसून येत आहेत. तरीही विधानसभेला माझे विरोधात उभे राहिलेल्या माजी आमदारपुत्रांनी हा केवळ आकडेवारींचा खेळ आहे अशी टिकाटिपणी केली होती. मी त्यांना अनेकदा जाहिरपणे विकासकामांच्या संदर्भात चर्चा करणेकरीता समोरासमोर येण्याचे आवाहन केले आहे. अनेकदा आवाहन करुनही ते समोरासमोर येत नाहीत आणि जनतेत बुध्दीभेद करण्याचे काम तेवढे ते चोख बजावितात.2009 च्या विधानसभा निवडणूकीच्या वेळी काय घडले? 2004 ते 2009 आमदार असताना विरोधी बाकावर बसून मी पहिल्यांदा आमदार होवून देखील 217 कोटी रुपयांचा निधी तालुक्यातील विविध विकासकामांना मंजुर करुन आणला व विकासकामे साधली याच विकासकामांच्या जोरावर जनता मला परत आमदार करेल असा विश्वास होता पण घडले काय? विरोधकांच्या भूलथापा आणि धनशक्तीचा वापर करुन राजकीय डावांनी जनतेचा घात केला.पण 2014 ला विरोधकांच्या भूलथापा जनतेच्या लक्षात आल्यानेच विरोधकांना जनतेने घरी बसविले.एका बाजूला तीन वर्षात 310 कोटी रुपयांचा निधी मी मंजुर करुन आणला. दुस-या बाजूला विरोधकांनी तीन वर्षात तालुक्यातील जनतेला काय दिले? पवारसाहेबांकडून आणलेला केवळ एक कोटी रुपयांचा निधी । हे सरळ गणीत असताना काही महिन्यापुर्वी झालेल्या जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणूकीमध्ये आपण तीन वर्षात केलेली विकासकांमे जनतेसमोर घेवून जा आणि मते मागा ही भूमिका ठेवली तरीही पंचायत समितीची सत्ता आपल्या हातातून विरोधकांच्या हातात गेली. विरोधकांच्या हातात देण्यासारखे काही नसताना ज्यांनी भरभरुन दिले त्यांना डावलून जनतेने काहीही न देणा-यांच्या बाजूने कौल दिला. जनतेने कौल दिला असला तरी तारळे, ढेबेवाडी,चाफळ गटामध्ये विरोधकांचे उमेदवार कशाप्रकारे निवडून आले हे मी सांगण्यापेक्षा मतदारांना चांगलेच माहिती आहे. आपला गाफीलपणा याकरीता कारणीभूत आहे. 2009 ला हाच गाफीलपणा आपले अंगलट आला होता. येणा-या 2019 च्या विधानसभा निवडणूकीत हा गाफीलपणा पुन्हा राहू नयें याकरीता पुन्हा एकदा लक्ष्य विधानसभा 2019 च्या या मेळाव्याचे आयोजन केले आहे. आपल्याकडे जनतेला विकासकांमे देवून त्यांच्या गावाचा विकास साधण्याव्यतिरिक्त विरोधकांप्रमाणे मतदारांना देण्यासारखे दुसरे काही नाही हे जनतेने लक्षात घेणे गरजेचे आहे.त्यामुळे येणारी निवडणूक ही आपल्याला केलेल्या विकासकामांच्या जोरावरच पुन्हा एकदा लढवायची आहे.यासाठी सर्वांनी आजपासूनच कामांला लागावे असे आवाहन त्यांनी शेवठी बोलताना केले. प्रारंभी आमदार शंभूराज देसाई यांचा त्यांचे वाढदिवसानिमित्त पाटण मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुह,तसेच शिवदौलत बँकेचे पदाधिकारी यांनी चांदीची तलवार भेट देवून जाहीर नागरी सत्कार केला. उपस्थितांचे स्वागत अशोकराव पाटील व सभेचे प्रास्ताविक डॉ.दिलीपराव चव्हाण यांनी केले. यावेळी दिलीप सकपाळ, बबनराव शिंदे, ड.डी.पी.जाधव, जयंवतराव शेलार यांची भाषणे झाली. आभार विजय पवार यांनी मानले.
विरोधकांचे राजकीय डावपेच लक्षात येत नाहीत
आपला स्वभाव बेधडक आहे लढायचे तर समोरुन.विरोधंकामप्रमाणे धनशक्तीचे राजकारण कधी आपल्याला जमलेच नाही. विरोधक सध्या शांत आहेत या भ्रमात आपण सर्वजण आहोत. 2009 ला ही असेच झाले होते. 217 कोटी रुपयांची विकासकांमे आणि आताची 310 कोटी रुपयांची कांमे पाहायची असतील तर समोरासमोर येण्याचे सातत्याने आवाहन करुनही विरोधक समोर येत नाहीत. विरोधक शांत असले तरी त्यांचे राजकीय डावपेच लक्षात येत नाहीत.
पाच वर्षात 1000 कोटी रुपयांच्या विकासकामांचा टप्पा पुर्ण करणार
गत तीन वर्षात रस्ते, पाणी, पुलांच्या कामांसाठी 310 कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. ही शासकीय आकडेवारी मार्च 2017 अखेरची आहे. आपल्याकडे अजुन दीड वर्षे शिल्लक आहेत या दीड वर्षात सर्वाधिक निधी तालुक्यात खेचून आणणेकरीता माझे प्रयत्न सुरु असून पाच वर्षाच्या आमदारकीच्या कारर्किदीत 1000 कोटी रुपयांच्या विकासकामांचा टप्पा आपण पुर्ण करणार आहे असा निश्चय आमदार देसाईंनी शेवठी व्यक्त केला.
विकासकामांच्या जोरावर मते मागा, विरोधकांकडे देण्यासारखे आहेच काय ? आमदार शंभूराज देसाई आवाहन आणि विरोधकांना टोला
RELATED ARTICLES