Sunday, March 23, 2025
Homeठळक घडामोडीग्रंथातूनच चांगला माणूस घडतो युवा पिढीने ग्रंथाचे वाचन करावे : जिल्हाधिकारी

ग्रंथातूनच चांगला माणूस घडतो युवा पिढीने ग्रंथाचे वाचन करावे : जिल्हाधिकारी

सातारा :  ग्रंथामुळे जीवनाला नवी दिशा मिळते, विचारांची देवान-घेवाण होते, ग्रंथ हे विचार करायला शिकवते, प्रेरणा देतात व जगण्याचे बळ देतात या ग्रंथातूनच एक चांगला माणूस घडतो, त्यामुळे युवा पिढीने जास्तीत जास्त ग्रंथ वाचावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत येथील अजिंक्य कॉलनी मैदानावर दि.18 व 19 नाव्हेंबर 2017 या कालावधीत ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांच्या हस्ते झाले, यावेळी त्या बोलत होत्या. या उद्घाटन  प्रसंगी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संभाजीराव पाटणे, प्रा. श्रीधर साळुंखे, कवी प्रदीप कांबळे, नगरसेविका सविता फाळके, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.
प्रत्येकाने सतत कोणत्याही एका पुस्तकाचे वाचन करणे आवश्यक आहे. कारण पुस्तके हि आपणांस ज्ञान देवून जीवन जगण्याचा मार्ग दाखवितात, असे सांगून जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल पुढे म्हणाल्या, वाचनामुळे अनेक गोष्टी आपल्याला समजायला मदत होते. मनुष्याचा सर्वात जवळचा मित्र म्हणजे पुस्तकफ होय. आपली एका पुस्तकाशी मैत्री झाली तर त्याद्वारे आपणांस अनेक पुस्तकरुपी मित्र भेटतात. आपल्या आयुष्यात ग्रंथांचे, पुस्तकांचे खूप महत्व आहे.  वाचन ही एक अशी गोष्ट आहे की, त्यामुळे आपल्या ज्ञानात सतत भरच पडत असते. एखादे प्रेरणादायी पुस्तक परत-परत वाचताना सतत आपल्याला नवा अनुभव येऊ शकतो. ज्ञानामुळेच आपल्याला प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. यासाठी आपण स्वतःला सतत अद्ययावत ठेवले पाहिजे. ग्रंथ ही आयुष्यातील सर्वात अमुल्य ठेव असते. ग्रंथांचे महत्व शब्दात सांगता येणार नाही. प्रत्येक कुटुंबाने एकतरी ग्रंथ विकत घेवून तो आपल्या घरात युवकांना वाचनस द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ग्रंथ हे प्रत्येक वाचकांपर्यंत पोहचले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त  करुन श्रीधर साळुंखे पुढे म्हणाले, ग्रंथवाचनाने खरे जीवन जगता येते. ग्रंथाच्या सानिध्यात राहिलेला माणूस हा समाजातील चांगला माणूस म्हणून पुढे येतो. ग्रंथ वाचनाची संस्कृती वाढली पाहिजे. यामुळे चांगला समाज निर्माण होईल. ग्रंथ वाचनामुळे आत्म्याचे शुद्धीकरण होते. सुसंस्कृत पिढी घडविण्याचे काम ग्रंथ करतात. ग्रंथ हे आपले खरे मित्र असून ग्रंथ प्रत्येकाने वाचले पाहिजेत.  जिल्ह्यात ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन दिपक शिंदे यांनी केले तर सर्वांचे आभार नंदा जाधव यांनी मानले. या कार्यक्रमास ग्रंथालय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular