कोरेगाव : राज्य सरकार शेतकर्यांबाबत उदासीन असून, ते शेतकरी हिताचा निर्णय घेऊ शकत नाहीत. येत्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारला शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी भाग पाडणार आहे, असा इशारा आ. शशिकांत शिंदे यांनी दिला.
मार्केटयार्डमधील गिताई मंगल कार्यालयात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आ. शिंदे अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य जयवंत भोसले, जिल्हाध्यक्ष सुनील माने, तालुकाध्यक्ष भास्कर कदम, कार्याध्यक्ष श्रीमंत झांजुर्णे, शिवाजीराव महाडिक, नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष जयवंत पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आ. शिंदे पुढे म्हणाले, उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी शेतकरी कर्ज माफी करण्याचा निर्णय भाजप घेत आहे, मग महाराष्ट्रात भाजपचे सरकार असून देखील कर्जमाफीचा निर्णय का घेतला जात नाही. सरकारचे धोरण चुकीचे असून, सरकारला जागा दाखवून देण्यासाठी सर्वपक्षीय विरोध करणे गरजेचे आहे. कोरेगाव तालुक्यातून सर्वपक्षीय मोर्चाचे नियोजन करण्याचा प्रयत्न केला, मात्र कमी वेळेत त्याचे नियोजन होऊ शकले नाही. लवकरात लवकर सर्वपक्षीय मोर्चाचे नियोजन होणार असून, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. आनंदराव पाटील यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे.
आता सातारा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे लोण पोहोचले आहे. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष शेतकर्यांची थट्टा करत आहेत. राज्य सरकार दुटप्पी भूमिका घेत असल्याने त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची गरज निर्माण झालेली आहे. कोरेगाव तालुक्यातून सर्वपक्षीय लढा उभारला जाणार असल्याचे आ. शिंदे यांनी स्पष्ट केले. शेतकरी आता संपावर जाणार आहेत, तो निर्णय योग्यच आहे. मुंबई आणि लगतच्या मोठ्या शहरांची रसद बंद केल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही. दोन महिने संपूर्ण रसद बंद केल्यावर सरकारला शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्यावाच लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी भास्कर कदम, शिवाजीराव महाडिक, प्रदीप विधाते व राजेंद्र भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीमंत झांजुर्णे यांनी आभार मानले.