पाटण: पाटण तालुक्यातील काळोली येथील तरूण कार्यकर्त्यांनी आणि गावातील संजीवन तरूण मंडळ मुंबई (काळोली) यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील जेष्ठ नागरीक सर्व शेतकरी बांधवाचा सत्कार करण्यात आला. तसेच तामकडेतील जळीतग्रस्त शेतकर्यास प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. शेतकरी जगाचा पोशिंदा असून त्याच्याकडे आणि कुटुंबाकडे लक्ष देण्यासाठी कोणालाही वेळ नाही ही दुर्दैवाची बाब आहे. मात्र संजीवन तरूण मंडळाकडून शेतकर्यांचा उचित सन्मान केला गेला असल्याचे समाधान मिळाल्याचे संजिवन तरुण मंडळाचे मार्गदर्शक शिवाजी पवार यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले शेतकर्याने आपल्या शेतीत धान्य पिकविले तरच देश चालेल. देशाचा आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू म्हणून शेती विकासाकडे पाहिले जाते. त्यामुळे खर्याअर्थाने शेतकर्यांची उन्नती झाली पाहिजे. अशा या शेतकर्याचा सन्मान होणे क्विचितच पहायला मिळते. संजीवन तरूण मंडळाने नेहमीच राबविलेले सामाजिक उपक्रम चांगले असून त्यांना समाजाचा देखील पाठिंबा राहिला आहे. आपला देश कृषी प्रधान देश असून या देशातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. देशातील शेतकरी बांधवानी शेतामध्ये काही पिकवले नाही तर आपण काय खाणार? त्यांच्या मेहनतीला आणि त्यांनी पिकवलेल्या मालाला योग्य दर मिळत नाही. अनेकवेळा त्यांना नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड देत असतो. शेतकर्याचे आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. असे शेवटी त्यांनी सांगितले.
यावेळी गावातील सर्व समाजातील शेतकरी असणार्या ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व फेटा बांधून यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच काळोली गावालगत असणार्या तामकडे येथील जळीतग्रस्त शेतकरी राजाराम बापू पवार यांचा सत्कार करून त्यांना संजीवन तरूण मंडळ मुंबई (काळोली), सहारा ग्रुप मोरगिरी यांच्यावतीने आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. तसेच पाटण तालुक्यातील मुंबईमध्ये राहणार्या लोकांकडून देखील मोठ्या प्रमाणात मदत करणार असल्याची ग्वाही शिवाजी पवार यांनी दिली. संजीवन तरूण मंडळाचे अध्यक्ष संजय पवार यांनी सर्वांचे स्वागत केले. शिवाजी पवार यांनी सुत्रसंचालन व आभार मानले.
संजीवन तरूण मंडळाकडून ज्येष्ठ नागरीक शेतकर्यांचा सन्मान.
RELATED ARTICLES