Friday, March 28, 2025
Homeठळक घडामोडीसिद्धनाथाच्या नावानं चांगभलच्या रथोत्सवास लाखो भाविकांची उपस्थिती

सिद्धनाथाच्या नावानं चांगभलच्या रथोत्सवास लाखो भाविकांची उपस्थिती

म्हसवड (विजय भागवत) : सिध्दनाथाच्या नावानं चांगभलच्या गजरात व  लाखो भाविकांच्या उपस्थित श्री. सिध्दनाथ व माता जोगेश्‍वरी यांचा रथोत्सव पार पडला.
अखिल महाराष्ट्र तसेच आंध्र, कर्नाटक या राज्यातील अनेक भाविकांचे श्रध्दास्थान व दैवत असणार्‍या म्हसवड येथील श्री. सिध्दनाथ व माता जोगेश्‍वरी यांच्या उत्सवमूर्ती सालकरी यांच्या घरुन वाजत-गाजत रथामध्ये बसविण्यात आल्या. रथामध्ये उत्सवमूर्ती बसविल्यानंतर श्रींच्या मूर्तींच्या रथातून मिरवणुकीस प्रारंभ झाला. रथावर बसण्याचा मान राजेमाने घराण्याचा असून अजितराव राजेमाने, आबासाहेब राजेमाने, बाळासाहेब राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, सयाजी राजेमाने, विजयसिंह राजेमाने,गणपतराव राजेमाने,शिवराज राजेमाने,तेजसिंह राजेमाने,दिपसिंह राजेमाने,शहाजीराजे राजेमाने,विश्वजित राजेमाने,तसेच बाळासाहेब माने, यांच्या उपस्थित रथोत्सवास प्रारंभ झाला.
श्रींचा विवाह सोहळा एक महिनाभर चालतो. दिवाळी पाडव्यादिवशी घटस्थापनेचे व हळदी समारंभाने या विवाह सोहळ्यास प्रारंभ होते. त्यानंतर तुळशीविवाह रात्री 12 वाजता श्री. सिध्दनाथांचा व माता जोगेश्‍वरी यांचा विवाह सोहळा संपन्न होत असतो. तर आज बुधवार 30 नोव्हेंबर रोजी लग्नानंतरची वरात म्हणजेच रथोत्सव संपन्न झाला.
रथ नगर प्रदक्षिणेस सुरुवात झाल्यानंतर माणगंगा नदीच्या पात्रात आला. भाविकांनी रथावर गुलाल व खोबर्‍याची उधळण केली. तसेच  अनेक भक्तांनी निशाने, नारळाची तोरणे, पैशांच्या नोटांची तोरणे श्रींना अर्पण केली. आजच्या दिवशी म्हसवडनगरी गुलालात न्हाऊन गेली होती. माणगंगेच्या नदीपात्रातून रथ नगरप्रदक्षिणेसाठी निघाल्यानंतर उजवी प्रदक्षिणा घालून रथ नदीपात्रातून सातारा – पंढरपूर रस्त्यावर ओढत आणला. रथ ओढण्यासाठी जाड कासरे वापरले जातात. या कासर्‍यांना नाडा म्हणतात. भाविक कासर्‍याला धरुन रथ ओढत असतात. सातारा-पंढरपूर रस्त्याने रथ बसस्थान चौकातून पुढे सिध्दनाथ हायस्कूल चौकातून वाघजाई ओढ्यात आणण्यात आला. याठिकाणी वाघजाई ही सिध्दनाथ बहिण मानली जाते. श्री. सिध्दनाथ यांच्या बहिणीस मानकर्‍यांच्या हस्ते साडी-चोळी यांचा आहेर करण्यात आला. याच ठिकाणी नवसाची मुले रथावरुन खाली टाकण्यात आली. व नवस फेडण्यात आले. आपली मुले निरोगी व्हावीत म्हणून नवस करण्यात येतात व नवस फेडले जातात. त्यानंतर रथ वाघजाई ओढ्यातून पुढे कन्या विद्यालय श्री. लक्ष्मीआई मरीआई मंदिर मार्गावरुन नगरप्रदक्षिणा पूर्ण करुन रात्री मूळ जाग्यावर आणण्यात आला.
परिसरातील अनेक भागातून भाविक सासण काठ्या नाथांच्या दर्शनासाठी घेऊन आले होते. अनेक नवसांच्या मुलांचे वजनाइतके गुलाल खोबरे रथावर उधळण्यात येते. अशा अनेक नवसांच्या मुलांचे गुलाल खोबर्‍याने वजन करण्यात आले व ते गुलाल खोबरे रथावर उधळण्यात आले.
राथयात्रेचे वैशिष्ठ्य म्हणजे येथील जिलेबी होय.यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात जिलेबीची विक्री झाली. यात्रेला येणारे भाविक जिलेबी प्रसाद म्हणून घेऊन जातात. तसेच यात्रेमध्ये करमणुकीची साधनेही मोठ्या प्रमाणात आली आहेत. यामध्ये लोकनाट्य तामाश्याचाही समावेश आहे.मिठाईची दुकाने,हॉटेल्स मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली आहेत.याशिवाय मोठे पाळणे, ड्रॅगन, रेल्वे, मिकिंमाऊस हि लहान मुलांची खास आकर्षण असलेली खेळणीही यात्रेचे आकर्षण ठरत आहेत. सिध्दनाथ देवस्थान पब्लिक ट्रस्टच्या वतीने मंदिरात भाविकांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष देत होती.
भाविकांच्या सोयीसाठी एस.टी. महामंडळातर्फे कराड, वडूज, अकलूज, विटा, सातारा, मेढा, सोलापूर, पंढरपूर,आटपाडी आदी आगारांनी जादा गाड्या सोडल्या होत्या.
म्हसवड पोलीस स्ठेशनच्या वतीने चोख बंदोबस्थ ठेवाला होता.यासाठी ज्यादा बंदोबस्त मागवण्यात आला होता.यामध्ये पोलीस उपअधीक्षक यशवंत काळे यांच्यासह सात पोलीस अधिकारी,110 पोलीस कर्मचारी,35 महिला अधिकारी,पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाण,आपत्कालीन पथक यांचा समावेश होता.
म्हसवड नगरपरिषदेचे नूतन नगराध्यक्ष तुषार वीरकर, नूतन नगरसेविका सौ. हिंदमालादेवी राजेमाने,सौ. स्नेहल युवराज सूर्यवंशी, सौ.सविता माने, सौ.सविता म्हेत्रे, कलाबाई पुकाळे,नगरसेवक शहाजी लोखंडे,गणेश रसाळ,धनाजी माने,केशव कारंडे, दीपक बनगर,मनीषा विरकार, साळूबाई कोळेकर, सौ. तेजस्वी सोनावणे, डॉ. वसंत मासाळ, रणजित येवगे, शोभा लोखंडे , अकिल काझी यांनी सिद्धनाथाच्या रथावर गुलाल खोबर्‍याची उधळण केली.
प्रशासनाच्यावतीने प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार सुरेखा माने, म्हसवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील व नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी, पुरवठा अधिकारी राहुल जाधव, गावकामगार तलाठी गुलाब उगलमोगले,मंडलाधिकारी जगताप,विजवितरण कंपनीचे म्हसवड कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर करे,माण तालुका वैदयकिय अधिकारी  डॉ.लक्ष्मण कोडलकर, डॉ.समीर तांबोळी यांनी रथोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
यात्रेकरूंच्या सोयी साठी शेखरभाऊ गोरे यांनी पाण्याचे दोन टँकर दिले होते , त्यामूळे भाविकांना पाणी पुरवण्यास मदत झाली

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular