(छायाः प्रकाश वायदंडे, प्रमोद इंगळे, संजय कारंडे)
साताराः येथील जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर मंगळवारी विविध आंदोलने आणि मोर्चानी गजबजून गेला होता. लहूजी शक्ती सेनेच्यावतीने तामिळनाडू राज्याप्रमाणेच घटनेच्या विविध कलमानुसार मातंग समाजाला शिक्षण व नोकरीत स्वतंत्र आरक्षण मिळावे, प्रख्यात साहित्यात स्व.आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, संगमवाडी पुणे येथील आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद यांच्या स्मारकाचे काम तात्काळ सुरू करावे, तसेच विविध क्रांतीवीरांचे व समाजसुधारकांचे पुतळे विधानसभेत व संसदेत बसवावेत आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी लहूजी शकतीसेनेचे सचिन कांबळे, विजय क्षीरसागर, समाधान खुडे आदी सहभागी झाले होते.
दरम्यान सातारा येथे वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी संजीवन बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेच्यावतीने रविंद्र कांबळे व कार्यकर्त्यानी आमरण उपोषणाला सुरूवात केली.
सातार्यात शाळा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात मोर्चा
राज्यशासनाने पटसंख्या दहापेक्षा कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आणि याचे तीव्र पडसाद सातार्यात आज मंगळवारी उमटले. शासनाच्या या निर्णयाविरोधात विविध शाळामधील विद्यार्थी रस्त्यावर उतरले. आणि त्यांनी मोर्चा काढून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकार्यांना सादर केले.
राईट टू ई चा कायदा सांगणारे शासन या कायद्याची पायमल्ली करत आहेत यामुळे याचे तीव्र पडसाद भविष्यात उमटतील असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. शाळकरांच्या या मोर्चात माजी आ.पदमश्री लक्ष्मण माने, अॅड. वर्षा देशपांडे, चंद्रकांत खंडाईत, विविध पक्षातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. शाळकरी मुलामुलींच्या जोरदार घोषणाबाजीने या मोर्चाकडे सातारकरांचे लक्ष वेधले गेले.