पाटण, दि. 3 : पाटण तालुका हा निसर्गसंपदेने नटलेला असून येथील वन्यप्राणी आणि निसर्ग हे दोन्ही आपले भांडवल आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बफ्फर झोन, कोअर झोन, अभयारण्य, पश्चिमघाट या क्षेत्रातील अडचणी, नियम व कायद्याचे पालन करून वनशेती करावी लागणार आहे. त्यासाठी वनविभाग व प्रशासनाने लोकांच्या मनातील संभ्रम दूर करून कोणकोणत्या विकासाच्या योजना राबविता येतील याची माहिती दिली पाहिजे. येथील ४६ गावांमध्ये पर्यावरणपूरक व्यवसायाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी कृषी पर्यटन व्यवसायाला चालना देवून पर्यटनातून रोजगारनिर्मिती व समृध्दी झाली पाहिजे. पाटण तालुक्याचा पर्यटनातूनच कायापालट होवू शकतो, असे प्रतिपादन माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक”मसिंह पाटणकर यांनी केले.
पाटण एज्युकेशनल अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्यावतीने कोयनानगर येथे आयोजित केलेल्या इको टुरिझम, वाईल्ड लाईफ टुरिझम, ऍग”ो टुरिझमबाबत मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, पाटण पंचायत समितीचे उपसभापती राजाभाऊ शेलार, पुणे येथील निसर्ग निर्मिती संस्थेचे अध्यक्ष नितीन मोडक, कोयना वन्यजीवचे शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विक्रमसिंह पाटणकर पुढे म्हणाले, कृषी पर्यटनाच्या माध्यमातून कोयना विभागात रोजगार उपलब्ध करणे हा मूळ उद्देश आहे. आज दुर्गम व डोंगराळ भागातील युवक रोजगारासाठी आपले गाव सोडून मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये जात आहे. डोंगरावरील लोकांना रोजगार निर्माण झाला पाहिजे. लोक वन्यप्राण्यांच्या भितीने घराला कुलुपे लावून गाव सोडून जात आहेत. मात्र याठिकाणी वनशेतीच्या माध्यमातून भरपूर काही करण्यासारखे आहे. येथे पर्यटन व्यवसायाशिवाय पर्याय नाही हे देखील लक्षात घेतले पाहिजे. पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होवू शकते. वनविभागाने १४ गावे वगळण्याबाबतही लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी वनविभाग व प्रशासनातील अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळणे हे तितकेच गरजेचे आहे. वनविभाग आणि प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून व माहिती घेवून पाऊल टाकले तर आपले नुकसान होणार नाही. पर्यटनाबाबत विद्वान माणसाचे पीक वाढत असून कोणतीही माहिती नसताना संभ्रम निर्माण केला जात आहे. नको त्या प्रवृत्तीला डोके वर काढू दिले त्यांना रोखले पाहिजे, असे त्यांनी
निसर्ग निर्मिती संस्थेचे अध्यक्ष नितीन मोडक म्हणाले, निसर्गाने भरभरून दिलेल्या संपदेचा फायदा घेवून कृषी पर्यटनाला चालना दिली तर रोजगारनिर्मिती आणि विकास या दोन्ही गोष्टी साध्य होवू शकतात. कृषी पर्यटन हा शेतकऱ्यांना नक्की कोट्यधिश करू शकतो. त्यासाठी कृषी पर्यटन व्यवसाय नव्हे तर चळवळ म्हणून हाती घ्यावी. माणुसकीची खरी ओळख कृषी पर्यटनातून होते. गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही शासनाचा पर्यटनाला ब्रँड ऍम्बेसिटर असावा त्यातून कृषी पर्यटन धोरण अवलंबले जाईल. कोयनेचा निसर्ग स्वित्झर्लंडप्रमाणे असून येथे प्रामाणिकपणे पर्यटन व्यवसाय करावा. येथील एकमेव कृषी पर्यटन सहकारी संस्था पाहून अभिमान वाटला असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी नितीन मोडक यांनी कृषी पर्यटनाबाबत प्रात्यक्षिकेद्वारे माहिती दिली. तसेच पर्यटनाच्या माध्यमातून उद्योग-व्यवसाय निर्माण करू पाहणाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देवून त्यांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमास युवा नेते याज्ञसेन पाटणकर, पंचायत समिती सदस्य बबनराव कांबळे, धैर्यशील पाटणकर, नानासाहेब गुरव, सौ. शिलादेवी पाटणकर, यांच्यासह तालुक्यातील शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार आणि पर्यटनाच्या माध्यमातून उद्योग-व्यवसाय निर्माण करू पाहणारे युवक मोठ्या सं”येने उपस्थित होते.
चौकट:-
वन, वन्यजीव व पर्यावरण अधिकाऱ्यांचा
काढता पाय.
निसर्गाचे वरदान लाभलेल्या तालुक्याचा पर्यटन व्यवसायातूनच कायापालट होवू शकतो. कृषी पर्यटन, मेडीकल टुरिझम शिवाय वनशेतीसारख्या उद्योग, व्यवसायांबाबत लोकांच्यात अज्ञान आहे. वनविभाग, वन्यजीव, पर्यावरण व महसुल विभागाकडील नियम व कायदे याची जनतेला माहिती नाही. व्यवसायातील अडचणी दूर होवून योग्य मार्गदर्शन होण्याची गरज असल्याने शिबिरासाठी वन, वन्यजीव, पर्यावरण व महसुल विभागातील मान्यवरांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. प्रांताधिकारी श्रीरंग तांबे वगळता वन, वन्यजीव व पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिबिरातून काढता पाय घेतला. जनतेच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आस्थेने मार्गदर्शन करण्याची गरज असताना काढता पाय घेतलेल्या अधिकाऱ्यांची जनतेविषयी असणारी अनास्थाच यावेळी दिसून आली. याबाबत उपस्थितांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता.