वडूज : माण मतदार संघाच्या सर्वांगीण विकासात अडसर ठरण्याबरोबरच सर्वसामान्य जनतेमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणार्या आमदार जयकुमार गोरे व त्यांचे बंधू राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शेखर गोरे या दोन्ही गोरे बंधूंवर प्रशासनाने मोक्का लावावा अशी मागणी खटावचे माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
शेखर गोरे व समर्थकांवर झालेल्या खंडणीच्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. डॉ. येळगावकर म्हणाले, सौरउर्जा प्रकल्प उभारण्याबाबत सर्वाधिक चांगले वातावरण माण खटाव या दोन तालुक्यांत आहे. त्यादृष्टीने काही कंपन्यांनी सर्वेक्षणही सुरू केले होते. मात्र सर्वेक्षण करावयास येणार्या आधिकारी कर्मचार्यांना दमदाटी, मारहाण करणे, जागा मिळू न देणे, एखाद्याने कंपनी सुरू केल्यास त्याच्याकडून सक्तीने खंडणी वसूल करणे अशा प्रकारचे उद्योग गोरे बंधूंकडून सुरू आहेत. पाठीमागील काळात उभारलेल्या पवनचक्की प्रकल्पातही यांनी गुंडागर्दी करून कोट्यावधी रूपये मिळविले आहेत. हे करत असताना अनेक शेतकर्यांना त्यांनी देशोधडीला लावले. वाळूच्या अवैद्य व्यवसायाशी त्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हात आहेत. अशा प्रकारचे उद्योग करून मोठ्या प्रमाणावर मिळविलेला काळा पैसा ते निवडणूकीच्या वेळी वापरतात. त्यांच्या या प्रतापामुळे मतदार संघातील अनेक युवक व्यसनाधिन होण्याबरोबरच देशोधडीला लागले आहेत. तसेच वाळूची रात्रंदिवस राखण करण्यामुळे महसूल कर्मचार्यांचे दिवसाच्या कामावर लक्ष लागत नाही. सर्वसामान्य नागरिकांना किरकोळ दाखल्या, उतार्यांसाठी हेलपाटे घालावे लागतात. तर अतिवृष्टी, दुबार पेरणी आदींचे पंचनामे होऊ शकले नाहीत. त्यामुळे मतदार संघाच्या सर्वनाशाला कारणीभूत असणार्या गोरे बंधूंवर मोक्का लावण्याबरोबर त्यांना तुरूंगात डांबण्याशिवाय पर्याय नाही. या मागणी संदर्भात आपण राज्यपाल व मुख्यमंत्र्यांनाही भेटणार असल्याचे डॉ. येळगावकर यांनी यावेळी सांगितले.
पत्रकार परिषदेस वडूजचे बांधकाम सभापती वचन शहा, नगरसेवक अनिल माळी, जयवंत पाटील उपस्थित होते.
ज्या सौरउर्जा प्रकल्पाच्या संचालकास खंडणी मागणी झाली आहे, त्या संचालकांची औंध संस्थानशी मैत्री असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कितपत गांभीर्याने घेणार आहेत असा सवालही यावेळी डॉ. येळगावकर यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच भाजपा शासनास बदनाम करण्याऐवजी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी आपले डागी कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.