रत्नागिरीः जेव्हा राजसत्ता भ्रष्ट मार्गावर जाते, तेव्हा धर्मसत्ता त्याला मार्गावर आणते असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरुन वाद निर्माण झाला असून मुख्यमंत्र्यांनी राजसत्ता सोडावी आणि मग धर्मसत्ता करावी असा टीका काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
शनिवारी रत्नागिरीतील नाणिजमधील नरेंद्र महाराज यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, हंसराज अहिर आदी नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे रत्नागिरीत होणा-या या कार्यक्रमात घटनात्मक पदावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी सहभागी होऊ नये यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने म्हटले होते. मात्र त्यानंतरही मुख्यमंत्री फडणवीस या कार्यक्रमाला हजर होते. अनिस कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी आंदोलनही केले होते.
वादाच्या भोव-यात सापडलेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त विधान करुन आणखी भर घातली. राजसत्ता भ्रष्ट झाल्यावर धर्म सत्ताच त्याला मार्गावर आणते असे मुख्यमंत्री म्हणालेत. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरुन आता टीकेची झोड उठली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. राजसत्ता संपुष्टात आली असून ते धर्मसत्तेचा आधार घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी सत्तेतून पायउतार व्हावे आणि मग धर्मसत्ता करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
राजसत्ता जेव्हा भ्रष्ट होते तेव्हा धर्मसत्ता त्याला मार्गावर आणते ः मुख्यमंत्री
RELATED ARTICLES