सातारा : गेल्या तीन वर्षाच्या अच्छे दिनच्या सरकारमध्ये सामान्य जनतेला महागाई, वाढती बेरोजगारी, जीएसटी व इतर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आता तर वीज भारनियमनाने जिल्ह्यामध्ये असंतोष पसरला आहे. आज वीज मंडळाला टाळा भेट देण्यात आला. पण राष्ट्रवादीने चावी आपल्या हाती ठेवली. आठ दिवसांत वीज मंडळाने सुधारणा न केल्यास भेट दिलेल्या टाळ्याला चावी लावून ते बंद करण्यात येईल, असा गर्भित इशारा राष्ट्रवादी नेते आ. शशिकांत शिंदे यांनी यावेळी दिला. या मोर्चाला जिल्ह्यातून आलेल्या युवकांची तसेच राष्ट्रवादी समर्थकांची गर्दी खेचणार्या तेजस नेतृत्वाची या आंदोलनानिमित्त राज्यभर चर्चा सुरु झाली आहे.
आज सकाळी 11 वाजता माण, खटाव, फलटण, वाई, सातारा, जावली, कोरेगाव, कराड, पाटण, महाबळेश्वर, जावली, खंडाळा तसेच सातारा शहरातून मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचा ध्वज हातात घेवून युवकांनी सातारच्या दिशेने कूच केली होती. संगमनगर येथील वीज मंडळाच्या कार्यालयात राष्ट्रवादीने निवेदन देवून अधिकार्यांना टाळा भेट दिला. या टाळ्याची चावी आ. शिंदे यांनी स्वत:कडे ठेवून आठ दिवसांची मुदत दिली. वीज मंडळाने सुधारणा न केल्यास वीज मंडळाच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडण्यात आला. प्रारंभी राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील, राष्ट्रवादी नेते शेखर गोरे यांची पत्नी सोनल गोरे, आ. बाळासाहेब पाटील व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे म्हणाले, राष्ट्रवादी हा सातारा जिल्ह्याचा बालेकिल्ला आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांने चालणार्या जिल्ह्यात सध्या सत्ताधारी भाजप अन्याय करत आहे. ज्या कोयनेने महाराष्ट्राला वीज दिली, त्याच जिल्ह्यात सातत्याने भारनियमन करुन शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक यांचे नुकसान केले जात आहे. आम्ही लोकशाही मार्गाने मागण्यांचे निवेदन दिले आहे. त्याचा स्विकार अधिकार्यांनी केला असून कामकाजात सुधारणा होण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर आदरणीय शरद पवार साहेब यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादीचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरेल. त्यावेळी सरकारला कोणताही पर्याय राहणार नाही. मी, आ. शिंदे यांची माथाडी चळवळीतील आक्रमकता वयाच्या पाच वर्षापासून पाहत आलो आहे. सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष म्हणून मला संधी मिळाली आहे. ती मी संघर्षातून सिद्ध करुन दाखवेन, व सामान्यांचे प्रश्न सोडवेन, असे स्पष्ट केले.
सौ. सोनल गोरे म्हणाल्या, सामाजिक कार्यासाठी शेखरभाऊ गोरे यांनी हजारो नव्हे तर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. आजही सर्वसामान्यांना ते मदत करतात. ते खंडणी मागू शकत नाहीत, याची खात्री राष्ट्रवादी नेत्यांना झाल्यामुळेच मोका प्रकरणी राष्ट्रवादी पाठीशी उभी राहिली आहे. न्यायालयावर आमचा विश्वास आहे, असेही त्यांनी सांगितले. वीज मंडळाचे कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दीड किलोमीटर भर उन्हात कार्यकर्ते शांतपणे मोर्चात सामील झाले होते. युवकांचा उत्साह पाहून आ. शिंदे भारावून गेले होते. आपल्या मुलाच्या नेतृत्वगुणाची कसोटी पाहताना त्यांच्या चेहर्यावर समाधान होते. यावेळी मोर्चा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी सरचिटणीस राजकुमार पाटील, सुरेखा पखाले, निवास शिंदे, जयश्री साळुंखे, किरण साबळे, जि. प. समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, अजित भोसले, मोरघरचे चंद्रकांत गायकवाड, स्वप्नील डोंबे, जयकुमार इंगळे, विक्रांत शिर्के, मंगेश धुमाळ, समीर राजेघाडगे, गोरखनाथ नलवडे, अॅड. नितीन भोसले, सौ. कुसूमताई भोसले, जयवंतदादा भोसले, संजय पिसाळ, सत्पाल फडतरे, बाळासाहेब सोळस्कर, श्रीमंत झांझुर्णे व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
सातार्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चात मान्यवरांची उपस्थिती
RELATED ARTICLES