सातारा (जि.मा.का): ‘संविधान दिन’ आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने भारतीय संविधानातील उद्देशिकेचे सामूहिक वाचन करुन साजरा करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी संविधानाच्या पुढील प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. “आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याचा सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता ; निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तींच्या प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन; आमच्या संविधानसभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करीत आहोत.”
यावेळी अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अविनाश शिंदे, तहसीलदार सोनिया घुगे, जयश्री आव्हाड आदींसह विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.