सातारा : हाय वे हा हाय वे नाही तो डेथ वे आहे, असे म्हणले तर चुकीचे ठरणार नाही, इतके अपघात या महामार्गावर झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांचे कोणतेही नियंत्रण नाही. पिडीताला जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत या अधिकार्यांना कैदेत ठेवा, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा सूचना खासदार श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी आज केल्या.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात जिल्हा विकास समन्वय व नियंत्रण समिती (दिशा)ची बैठक आज घेण्यात आली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील, उपाध्यक्ष रवी साळूंखे आदी उपस्थित होते.
सभेच्या सुरवातीला वाहतूक पोलीस विलास शिंदे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच माणची धावपटू ललिता बाबर हिच्या अभिनंदनाचा ठरावही करण्यात आला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एन. एल. थाडे यांनी यावेळी प्रास्ताविक करुन संगणकीय सादरीकरण केले. यावेळी खासदार श्री. भोसले पुढे म्हणाले, काळ्या यादीत असणार्या लोकं महामार्गाचे काम करीत आहेत. जागोजागी मोठमोठे खड्डे आणि अपूर्ण पुलांची कामे दिसून येतात. मग टोल कशासाठी द्यायचा, असा प्रश्न करुन या महामार्गावर एकही अपघात झाला तर संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स कंपनी दोषी धरुन कठोर कारवाई करावी. जोपर्यंत मदत मिळत नाही, तोपर्यंत त्यांच्या अधिकार्यांना कैदेत ठेवा, अशी सूचना केली.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून मागितलेली माहिती मिळत नाही, अशी नाराजी व्यक्त करुन खासदार श्री. भोसले पुढे म्हणाले, तालुकास्तरावर त्यांनी किती बैठका घेतल्या. शेतकर्यांना बियाणे मिळत नाही. कृषी खात्याने केलेल्या कामांचा दर्जा निकृष्ट आहे. कृषी खात्याच्या कारभाराविषयी चौकशी नेमण्यात यावी. अधिकारी आणि पदाधिकारी यांनी समन्वय आणि सकामरात्मक दृष्टीकोन ठेऊन वाटचाल करणे आवश्यक आहे. या जिल्ह्याने राज्याला दिशा दिली आहे. भविष्यात जिल्ह्याची आणखी मोठ्या प्रमाणात प्रगती व्हावी. त्यादृष्टीने सर्वांनी काम करावे, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या घडीपूस्तीकेचे प्रकाशन करण्यात आले.
जिल्हाधिकारी श्री. मुद्गल यावेळी म्हणाले, जिल्ह्यातील रिक्त वैद्यकीय अधिकारी पद भरतीची सूचना देण्यात आली आहे. कातकरी समाजाला घरकूल मिळण्याबाबत क्लस्टर पध्दतीने करता येईल का याबाबत डिआरडिएने अभ्यास करावा. फळबाग लागवड संदर्भातील तक्रारीबाबतचा अहवाल कृषी आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. विविध शासकीय योजनांमध्ये काही बँकाची प्रगती चांगली आहे. अजूनही चांगले काम बँकानी करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी विविध विभाग प्रमुखांनी संगणकीय सादरीकरण करुन आढावा दिला. शेवटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी आभार मानले.