जिल्ह्यातील कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय : तात्यासाहेब डेरे
कोरेगाव : राज्यातील मुद्रांक विक्रेत्यांवर शासनाने अन्याय सुरु केला असून, पाचशे रुपयांपेक्षा अधिकच्या मुद्रांकांची विक्री परिपत्रक काढून बंद केली आहे. त्याचबरोबर मुद्रांक विक्रेत्यांच्या न्याय मागण्या प्रलंबित ठेवल्या आहेत, त्याच्या निषेधार्थ सोमवार दि. 25 जुलै रोजी मुंबईत आझाद मैदानावर मुद्रांक विक्रेते धरणे आंदोलन करणार आहेत, त्यादिवशी जिल्ह्यातील सर्व कामकाज बंद ठेवले जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र मुद्रांक व दस्त लेखक महासंघाचे उपाध्यक्ष तात्यासाहेब डेरे यांनी दिली.
या संदर्भात तात्यासाहेब डेरे यांच्या नेतृत्वाखाली अखिल महाराष्ट्र स्टँप व्हेंडर अँड बाँड रायटर, पिटीशन रायटर्स असोसिएशनच्यावतीने सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी ए. एस. नढे यांना अध्यक्ष शंकर भिसे, उपाध्यक्ष सचिन मोहिते, सचिव दीपक तावरे यांनी नुकतेच निवेदन सादर केले. त्यामध्ये त्यांनी शासनाकडून सुरु असलेल्या अन्यायाची माहिती दिली आहे.
शासनाने सर्वसामान्यांवर अन्याय करत मुद्रांकाबाबतचे धोरण बदलले आहे. दि. 13 जानेवारी 2015 रोजी परिपत्रक काढून पाचशे रुपयांपुढील मुद्रांक विक्री बंद केली आहे, त्यामुळे स्टँप व्हेंडर्स यांना मिळणारी मनौती बंद झाली आहे, ती पूर्ववत सुरु करण्याची राज्यातील संघटनांची मागणी आहे. याबाबतीत राज्यात प्रत्येक तालुकास्तरावर सातत्याने आंदोलने करुन शासनाचे लक्ष वेधण्यात आले, मात्र शासनाने जाणीवपूर्वक लक्ष दिले नाही. याबाबतीत स्थानिक लोकप्रतिनिधींना देखील निवेदने देण्यात आलेली होती, मात्र शासनाने निर्णय घेतला नाही, असा आरोप डेरे यांनी केला.
सोमवार दि. 25 जुलै रोजी राज्यातील मुद्रांक विक्रेते मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार असल्याने जिल्ह्यातील सर्व मुद्रांक विक्रेते आपले मुद्रांकांचे व्यवहार व ई-चलन काढण्याचे कामकाज एक दिवसासाठी बंद ठेवणार आहेत, जनतेच्या होणार्या गैरसोईबद्दल डेरे यांनी संघटनांच्यावतीने दिलगिरी व्यक्त केली आहे.