कराड : राज्यात निघत असलेल्या मराठयांच्या मुकमोर्चाला कोणत्याही पक्षाची किंवा नेत्याची फुस नाही. विषेशता राष्ट्रवादीची नाहीच नाही. कोपर्डी घटनेनंतर स्वयंस्फुर्तीने लोक रस्त्यावर आले आहेत. मराठा आरक्षण, कोपर्डी प्रकरणातील नराधमाला शिक्षा व अॅट्रॉसिटीतील शिथीलता या मोर्चेकर्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. या मराठी बांधवांच्या मागण्यांचा विचार पहिल्या मोर्चा वेळीच सरकारने करावयाला हवा होता. तेव्हा आजुन वेळ गेलेली नाही. निघत असलेल्या मराठा मोर्चाची सरकारने त्वरीत दखल घ्यावी. मोर्चेकर्यांच्या सहनशिलतेचा सरकारने अंत पाहू नये अशी प्रतिक्रीया राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
मराठा मुक मोर्चा या विषयावर येथील विश्राम गृहावर पत्रकारांशी भाष्य करताना ते बोलत होते. यावेळी आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, जयंतकाका पाटील, प्रशंात यादव, इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. पवार म्हणाले, राज्याच्या सत्तेत आम्ही होतो त्यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून आम्हीच मराठा मुस्लिम आरक्षणाबाबतची कार्यवाही चालू केली. न्यायालयात हा प्रश्न न्यायप्रविष्ट झाला त्यामुळे मराठा व मुस्लिम आरक्षणाची प्रक्रिया लांबली.
राज्यभरात निघत असलेले मुक मोर्चा, याला आम्ही फुस लावण्याच्या वावडया उठवल्या जात आहेत मात्र त्यात कोणतेही तत्य नाही. केंद्रात व राज्यात भाजपाची बहूमताची सरकारे आहेत. तेव्हा त्यांनी मराठयांच्या मागण्यांची दखल घेऊन वेळीच हा प्रश्न मार्गी लावावा. त्यांना आमचा व इतर पक्षाचा पाठिंबा राहिल. असे शेवटी अजित पवार म्हणाले.