सातारा : जगात आई ही मोठी शक्ती असल्याने मातृदेवतेची पुजा महत्वाची आहे. स्त्री सबलीकरणाची केवळ चर्चा न करता ते कृतीतून सिध्द झाले पाहिजे. स्त्रीयांच्या सबलीकरणाची सुरुवात प्रत्येकाने आपल्या घरातून केली तरच, समाज गतिमान होईल. कर्तव्य सोशल ग्रुप आणि स्वत:च्या माध्यमातून श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रासह मानवी आरोग्य आणि पर्यावरण रक्षणासाठी भरीव कार्य केले आहे. स्त्री सबलीकरण हे सौ. वेदांतिकाराजे यांनी आपल्या अजोड कृतीतून सिध्द केले असून रावबहाद्दूर संभाजीराव मोरे दुदुस्कर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार म्हणजे सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी स्त्रीयांसाठी केलेल्या कामाचा सन्मान आहे, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी काढले.
शाहू कलामंदीर येथे सातारा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था, कला व वाणिज्य महाविद्यायल आणि दुदुस्कर कुटुंबीयांतर्फे देण्यात येणारा रावबहाद्दूर संभाजीराव मोरे दुदुस्कर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार डॉ. शिंदे यांच्या हस्ते कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांना प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन शरदराव चव्हाण होते. यावेळी प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. संभाजीराव नलवडे, सचिव प्रा. रामचंद्र जाधव, संघटक जयेंद्र चव्हाण, निलेश दुदुस्कर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. शिंदे म्हणाले की, सातारा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था, कला व वाणिज्य महाविद्यायलयाने हा पुरस्कार सौ. वेदांतिकाराजे यांना दिला आणि त्यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक व रचनात्मक कार्याचा गौरव केला आहे. मानवाच्या आयुष्यातील प्रामाणिक संवाद हा विश्वासाचा ठेवा असतो. सबलीकरणाच्या गप्पा न मारता स्त्रियांना विचाराचे व निर्णयाचे स्वातंत्र्य देणे, विश्वास देणे आवश्यक आहे. छत्रपती शिवरायांच्या घराण्यातील एका कर्तुत्ववान स्त्रीचा आज सन्मान केला गेला. या स्त्रीने आपल्या अजोड आणि अलौकिक अशा कार्याने संपुर्ण समाजाला दिशा देण्याचे कार्य केले असून अशा या कर्तुत्ववान महिलेचा सन्मान माझ्या हस्ते होत आहे, हे माझे भाग्य आहे, असे डॉ. शिंदे म्हणाले.
पुरस्काराला उत्तर देताना सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या की, मला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून केलेल्या कामाची पोहोचपावती आहे. प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपलीच पाहिजे.
सामाजिक काम करताना समर्पित भावनेने काम केले पाहिजे. पर्यावरण, महिला सबलीकरण व आरोग्य रक्षणाच्या चळवळीत युवकांनी आणि विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा असून तरच, समाज आणि देश प्रगतीपथावर जाईल, असे सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. पाटणे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. महाविद्यालयाने शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात केलेली कामगिरी उल्लेखनिय आहे. विद्यार्थ्यांनी सामाजिक क्षेत्रघत काम करुन आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करावा, असे आवाहन डॉ. पाटणे यांनी यावेळी केले. महाविद्यालयाचे गुणवंत खेळाडू भैरव यादव व सोमनाथ सकट यांचा सत्कार आणि महाविद्यालयाच्या संशोधन अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
प्रा. डॉ. भरत जाधव यांनी सुत्रचंचालन केले. प्रा. गौतम काटकर यांनी मानपत्राचे वाचन केले. संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. नलावडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, प्राध्यापक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.