सातारा : सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील रवंदी, आडोशी, माडोशी, खिरकंडी, कुसापूर, वेळे ढेण आदी गावांचा समावेश कोयना अभयारण्य व व्याघ्रप्रकल्पात झाला आहे. दरम्यान, या गावातील प्रगल्पग्रस्तांचा पुर्नवसनाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. या सर्व प्रकल्पग्रस्तांचा पुर्नवसनाचा प्रश्न तातडीने सोडवावा. यासंदर्भात 15 दिवसांत अहवाल सादर करावा, असा आदेश वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधीत अधिकार्यांना दिला.
जावली तालुक्यातील रवंदी, आडोशी, माडोशी, खिरकंडी, कुसापूर, वेळे ढेण आदी गावातील प्रकल्पग्रस्तांचा पुर्नवसनाचा प्रश्न सोडवण्यासंदर्भात आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पुढाकाराने वनमंत्री ना. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक झाली. या बैठकीत अधिकार्यांना सुचना करताना ना. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आ. जयंत पाटील, आ. मकरंद पाटील, जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले यांच्यासह वन विभागाचे मुख्य सचिव विकास खार्गे, राजयगडचे जिल्हाधिकारी शितल उगले, कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक एम. के. राव, वन्यजीव वनसंरक्षक बेन, सातार्याचे अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, जिल्हा पुर्नवसन अधिकारी संजय आसवले, ठाणे जिल्हाधिकारी आणि संबंधीत सर्व अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत कोयना धरणग्रस्त व अभयारण्य प्रकल्पग्रस्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम पवार, उपाध्यक्ष तानाजी जाधव, रामचंद्र कोकरे- पाटील, किसन सपकाळ, आनंदा कदम आदी पदाधिकारी व प्रकल्पग्रस्तांनी आपल्या अडचणी मांडल्या. प्रकल्पग्रस्तांचा पुर्नवसनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभिर होत असून हा प्रश्न तातडीने न सोडवल्यास प्रकल्पग्रस्तांचा संयम सुटेल. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रीमहोदयांनी संबंधीतांना सुचना करुन प्रश्न निकाली काढावा, अशी आग्रही मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.
वेळे ढेण येथील 135 खातेदारांचे पुर्नवसन रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील पळसपे, नेरे व खालापूर तालुक्यातील रीस या तीन गावात करण्याचे ठरले आहे. तांत्रीक अडचणींची पुर्तता करुन पुर्नवसनाचा प्रश्न मार्गी लावणे आवश्यक आहे. तसेच रवंदी, आडोशी, माडोशी, खिरकंडी, कुसापूर येथील 124 खातेदारांपैकी 63 खातेदारांचे पुर्नवसन ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील सहागाव, एकसळ याठिकाणी करण्यात आले आहे. मात्र आतार्पंयत सातबारा खातेउतार्यावर संबंधीत प्रकल्पग्रस्तांची नोंद झालेली नाही. उर्वरीत 61 खातेदारांच्या पुर्नवसनासाठी सहागाव, एकसळ याठिकाणी जागा उपलब्ध नसल्यास रायगड जिल्ह्यात उपलब्ध जागेत त्यांचे पुर्नवसन करावे, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठकीत केली. घमासान चर्चेनंतर ना. मुनगंटीवार यांनी प्रकल्पग्रस्तांच्या पुर्नवसनासंदर्भात 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. सर्व संबंधीत अधिकार्यांनी सदर बाब गांभीर्याने घेवून पुर्नवसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी सक्त सुचना ना. मुनगंटीवार यांनी बैठकीस उपस्थित असलेल्या अधिकार्यांना केली. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे ना. मुनगंटीवार यांनी सकारात्मक निर्णय घेवून पुर्नवसनाचा प्रश्न मार्गी लावण्याचा आदेश अधिकार्यांना दिल्याने बैठक सफल झाली. यामुळे बैठकीस उपस्थित प्रकल्पग्रस्त, ग्रामस्थांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे अभिनंदन करुन आभार मानले.
जावली तालुक्यातील सह्याद्री व्याघ्रप्रकल्पग्रस्तांचे तातडीने पुर्नवसन करा
RELATED ARTICLES