कराड: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत शेतकर्यांची फसवणूक छत्रपतींच्या नावाने होत असेल, तर ते सहन करणार नाही. शेतकर्यांना भीक नको, कर्जमाफी पाहीजे. जर तुम्ही शेतकर्यांना कर्जमाफीच्या नावाखाली फसवत असाल तर तुमचा नक्कीच विचार करावा लागेल. जर शेतकर्यावर अन्याय करत असाल तर आम्ही तुमची काय तळी उचलू का, असा प्रश्न उपस्थित करत शेतकर्याचा 7/12 कोरा झाला पाहिजे, यावर आम्ही शेवटपर्यंत ठाम राहू अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
कराड येथील शेतकरी बांधवाशी संवाद साधण्यासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, आ.शंभूराज देसाई, माजी आ. दगडू सपकाळ, खा.गजानन किर्तीकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, सरकारने जाहीरातबाजी करून शेतकर्यांची दिशाभूल केली आहे. शेतकरी राबराब राबत असून त्याच्या हक्काचे मोल त्याला मिळत नाही. मुख्यमंत्री म्हणतात की, साडेसहा हजार रूपये कोटी रूपयांची कर्जमाफी दिली गेली, ती कुणाच्या खात्यात जमा झाली हे त्यांनाच माहित. कर्जमुक्ती, नोटबंदी, जीएसटीसारख्या बदलामुळे जनता हैराण झाली आहे. राज्यातील शेतकर्यांना 57 हजार वीज कनेक्शन मिळत नाहीत. जाहीरातबाजी करून 3 कोटी लोकांना गॅसचा सन्मान मिळाला, पण तो कुठेही दिसत नाही. यासाठी जाहीरातीच्या मोहजालातून बाहेर पडा. असा इशारा दिला. केवळ गुजरात निवडणुकीसाठी जीएसटी कमी करण्यात आला. कारण गुजरातचा व्यापारी रस्त्यावर उतरला, त्याला घाबरून जीएसटी कमी करण्यात आला. मात्र, ही निवडणूक झाल्यावर पुन्हा जीएसटी वाढवतील का, अशी शंका उपस्थित राहत आहे. यासाठी महाराष्ट्रातील व्यापार्यांनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे.
दरम्यान, ते पुढे म्हणाले, शरद पवार यांनी माझ्यावर टीका केली. सत्तेत असून मित्रपक्षावर टीका करणारे मी पहिल्यांदा बघितले. पण त्यांना हे सांगायचे आहे की, तुम्ही विसरला असाल पण आम्ही विसरलो नाही. स्वतःच्याच पक्षात राहून स्वतःच्याच नेत्याच्या पाठीत वार करून तुम्ही मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसलात हे लक्षात ठेवा. राष्ट्रवादी हल्लाबोल आंदोलन करतंय, तुमची लायकी आहे का, असे म्हणत तुम्ही सत्तेत असतानाचा 70 हजार कोटीचा हिशोब द्या आणि हल्लाबोल करा. तुमचा मुखवटा बदलला स्वभाव बदलला नाही हेही लक्षात ठेवा. तुम्ही राजकारण मोदींना शिकवा, आम्हाला शिकवू नका असे म्हणत आगामी मुख्यमंत्री शिवसेनेचा बसवल्याशिवाय शांत बसणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सातारा जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.नितीन बानुगडे-पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी भेट देवून आदरांजली वाहिली.