-(सर्व फोटो संजय दस्तुरे) अंधार ,कडाक्याची थंडी व तलावातील गार पाणी यात सुमारे 6 तास पाण्यातील भोवर्या सह खड्ड्यात सुमारे दोन ट्रक कापडी वस्तू घालताना पालिका कर्मचारी , तसेच नगरसेवक कुमार शिंदे ,महाबळेश्वर ट्रेकर्स चे सुनील बाबा भाटीया आदी दिसत आहेत .
महाबळेश्वर: महाबळेश्वर येथील प्रसिद्ध वेण्णा तलावाच्या भिंतीच्या पायातून प्रचंड प्रमाणात होणारी गळती महाबळेश्वर पालिकेच्या सुमारे चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर काबूत आली. सुमारे 80 टक्के गळती थांबल्याचे आज निदर्शनात आले. महाबळेश्वर येथील प्रसिद्ध वेण्णा तलावाच्या पायातून मोठ्या प्रमाणावर गेले दोन तीन महिने गळती सुरु होती. त्याबाबत महाबळेश्वरचे नगरसेवक रवींद्र कुंभारदरे यांनी त्यावर वृत्त पात्रांच्या माध्यमातून प्रकाश झोत टाकल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले होते. या तलावातील पाणी साठ्यातून महाबळेश्वर सह पांचगणी या दोन पर्यटन स्थळांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र दिवसेंदिवस वाढणारी गळती हि या दोन्ही पर्यटन स्थळांसाठी चिंतेचे कारण झाले होते. तसेच हि गळती वेळीच निघाली नाही तर वेण्णा नदीच्या पात्रालगतच्या गावानाही धरण भिंतीस मोठे भगदाड पडून धोका होणार होता .
प्रसिद्धी माध्यमांनी आवाज उठविल्यावर या भागातील आ. मकरंद आबा पाटील तसेच संबंधित खात्याचे वरिष्ठ येथे येवून पाहणी करून उपाय योजना करण्याचे नियोजन करण्यात आले . मात्र त्यास फारशी गती नव्हती. ही बाब गंभीर असल्याने नुकतेच सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी संबंधित खात्याच्या अधिकार्याशी बोलणी करून सूचना केल्या होत्या. दरम्यान रविवारी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय घोगरे या सह तज्ञाच्या पथकाने वेण्णा तलावाला भेट देवून गळती होणार्या धरण भिंतीच्या पाया लगतच्या भागाची पाहणी केली.
या वेळी महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, उपनगराध्यक्ष अफझलभाई सुतार, नगरसेवक कुमार शिंदे, नगरसेवक रवींद्र कुंभारदरे व अन्य नगरसेवक, नगरसेविका, तहसीलदार रमेश शेंडगे, महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनील बाबा भाटीया आदी उपस्थित होते. यावेळी पथकातील (गळती तज्ञ) विजय शिवतारे व अन्य जवानांना या पाया लगतच्या भागात मोठा खड्डा व भोवरा असल्याचे आढळून आले .तातडीने त्यांनी आपल्या अनुभवाप्रमाणे गळती या खड्ड्यातून, भोवार्यातुनच होती का? याची तपासणी केली. त्यासाठी त्यांनी कापूस, कापड याचा वापर केला व खात्री झाल्यानंतर हालचालींना वेग आला. तज्ञांच्या मार्गदर्शानानुसार महाबळेश्वरचे नगरसेवक कुमार शिंदे तसेच महाबळेश्वर ट्रेकर्स चे सुनील बाबा भाटीया यांनी वेगाने हालचाली करून पालिकेचा स्वच्छता विभाग, पालिका कर्मचारी, वेण्णा तलाव बोट क्लबचे कर्मचारी, पालिकेचा बांधकाम विभाग यांच्या मदतीने या या खड्ड्यात कापडीवस्तु, कापूस, कपडे टाकून ते बंद करण्याचा प्रयत्न सुरु झाला. मात्र कापडी वस्तू, कापूस कमी पडू लागला जेव्हा कापडी वस्तू घालू तेवड्या त्या सेकंदात भोवर्यातून तळाला जायच्या. रात्रीच्या अंधारात सर्च दिवे यांच्या मदतीने व थंडीचा कडका असतानाही तलावातील पाण्यात उतरून हे काम पालिकेचे कर्मचारी नगरसेवक कुमार शिंदे, महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनील बाबा भाटीया यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री 1 वाजे पर्यंत करीत होते .यासाठी त्यांनी रातोरात संपूर्ण महाबळेश्वर नागरी पालथी घालून येथील विविध हॉटेल्स, लॉजेस, अंजुमन हायस्कूल सह अन्य भागातून सुमारे दोन ट्रक कापडी वस्तू आणून या तलावातील खड्ड्यात व भोवर्यात भरल्या तसेच जेसीबीच्या सहाय्याने त्यावर मातीही टाकली. रात्री आठ वाजता सुरु केलेले हे काम सहा तासाच्या अथक प्रयत्ना नंतर थांबले दरम्यान आज सकाळी वेण्णा तलावाच्या गळतीची पाहणी केली असता सुमारे 80 टक्के गळती आटोक्यात आल्यचे निदर्शनास आले . त्यामुळे या दोन्ही पर्यटन स्थळांच्या नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. आजची गळतीची हि उपाय योजना नसली कायमची नसून या धरण भिंतीतून होणारी गळती कायम स्वरुपात थांबावे यासाठी पाणी कमी झाल्यानंतर हि प्रयंत्न सुरु राहणार असल्यची माहिती नगरसेवक कुमार शिंदे यांनी दिली.